सातारा -करोनाला रोखण्यासाठी जिल्हा परिषदेत प्रत्येक विभागात विभागप्रमुखांसह फक्त पाच टक्के कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आदेश असातानाही बांधकाम उत्तर, बांधकाम दक्षिण आणि टाऊन प्लॅनिंग या विभागात मात्र मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी होत होती. या विभागात “सोशल डिस्टंनसिंग’ची पायमल्ली करुन जण करोनाला निमंत्रण देण्याचाच प्रकार घडत होता.
याबाबत तक्रारी आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने या विभागांचे कान टोचले आहेत. या विभागांना सक्त सूचना दिल्यानंतर आता तरी या विभागात सुधारणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषदेत आरोग्य विभाग वगळता सर्व विभागात फक्त खातेप्रमुखांसह पाच टक्केच कर्मचारी उपस्थित राहवेत, असे आदेश आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागप्रमुखांनी नियोजन करण्याच्या सूचना होत्या. मात्र मार्च एंडचे कारण सांगून गेल्या काही दिवसांपासून बांधकाम दक्षिण, बांधकाम उत्तर आणि टाऊन प्लॅनिंग या विभागात मोठी गर्दी होत होती.
काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी संबंधित विभागांना गर्दी कमी करण्याबाबत सांगितले होते. मात्र, गेल्या दोन दिवसात तर या विभागात जणू ठेकेदारांचा बाजारच भरला होता. येणारे येतील पण त्यांना येऊ न देण्याची खबरदारी संबंधितांची होती, असा प्रश्नही या निमित्ताने निर्माण होत आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.
जिल्हा परिषद प्रशासनाने या तिन्ही विभागांमध्ये बाहेरचा कोणीही व्यक्ती येणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत त्यांना सूचना केल्या आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर पोलिस आणि जिल्हा परिषदेतील कर्मचारी संबंधितांची चौकशी करुन पुढील निर्णय घेत आहेत. प्रशासनाचा हा निर्णय चांगला असला तरी हे विभाग या सूचनांची किती अंमलबजावणी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.