मुंबई – कॉंग्रेस नेते राहुल गांधी पक्षाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यांना रोखण्यासाठी जुने लोक आतून भाजपसारख्या पक्षांशी हातमिळवणी करत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेने कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर निशाणा साधला.
कॉंग्रेसला सध्या नेत्यांचे गळतीसत्र, अंतर्गत कलह यांसारख्या समस्यांनी ग्रासले आहे. त्यातून कॉंग्रेसचे काही ज्येष्ठ नेते पुन्हा पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत.
त्यावर शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. कॉंग्रेस बुडवायची सुपारी कॉंग्रेसच्याच लोकांनी घेतलेली दिसते. अर्थात, सेनापतीच नाही तर लढायचे कसे, ही जुन्याजाणत्या कॉंग्रेसवाल्यांची भूमिकाही चुकीची नाही. कॉंग्रेस पक्षात नेता कोण हा प्रश्न आहेच. कॉंग्रेसने उसळी मारून उठावे. मैदानात उतरावे.
राजकारणात नवचैतन्याची बहार आणावी, अशी लोकभावना आहे. त्यासाठी कॉंग्रेसला आधी पूर्णवेळ अध्यक्ष हवाच. कॉंग्रेसशिवाय भाजपलाही जिंकता येत नाही. भाजपलाही कॉंग्रेसचे टॉनिक लागते. पण, ते कॉंग्रेस नेतृत्वास कधी उमगणार, असा सवाल शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तसेच, नेता कोण, अध्यक्ष कोण याविषयीचा भ्रम कॉंग्रेसने दूर करायला हवा, असेही सुचवण्यात आले आहे.