नवी दिल्ली – हरियाणातील काही शेतकऱ्यांनी वादग्रस्त ठरलेल्या केंद्रीय कृषी कायद्यांना पाठिंबा दर्शवला आहे. एवढेच नव्हे तर, ते कायदे मागे घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
भारतीय किसान युनियन(मान) या संघटनेचे नेते गुनी प्रकाश यांच्या नेतृत्वाखालील हरियाणातील 29 शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली. त्या शिष्टमंडळाने कृषी कायद्यांना पाठिंबा दर्शवणारे पत्र तोमर यांच्याकडे सोपवले.
संबंधित कायदे कायम ठेवण्याची मागणी त्या पत्रातून करण्यात आली आहे. कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले आंदोलन शेतकऱ्यांचे राहिलेले नाही. त्या आंदोलनाला राजकीय रंग चढला आहे.
खरेतर, कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना खरे स्वातंत्र्य लाभणार आहे, अशी भूमिका त्या शिष्टमंडळाने नंतर पत्रकारांशी बोलताना मांडली.
कृषी कायद्यांना पाठिंबा दर्शवणारे ते हरियाणातील शेतकऱ्यांचे दुसरे शिष्टमंडळ ठरले. याआधी 7 डिसेंबरला एका शिष्टमंडळाने तोमर यांची भेट घेऊन कृषी कायद्यांचे समर्थन केले होते.