इस्लामपूर (विनोद मोहिते) – राज्यात कोरोना काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्याचं पालकत्व स्विकारले. सर्व संकटांचा संयमाने सामना केला. राज्य सरकार अत्यंत चांगले काम करत आहे. मात्र काही असंतूष्ट आत्मे सरकारवर टिका करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी एकालाही प्रत्युत्तर दिलेले नाही. त्यांनी त्यांच्या कृतीतून सर्वांना उत्तर दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पदाधिका-यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. मात्र काही लोकांच्या हे पचनी पडत नाही ते बोलतच सुटलेत, अशी टीका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
शिवसेना सांगली जिल्हा कार्यालय येथे व्हेंटीलेटर मशिन वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. येथील उपजिल्हा रूग्णालय, आधार हॉस्पिटल व इस्लामपूर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलला प्रत्येकी एक अशा तीन व्हेंटीलेटर मशिनचे आज त्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नेते नितीन बाणूगडे-पाटील, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, प्रांताधिकारी विजय देशमुख, डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. राणोजी शिंदे, नंदकुमार निळकंठ , दि. बा. पाटील उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, ‘शिवसेना नेहमीच ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करते. शिवसेनेच्या वतीने सर्वसामान्य माणसाला उपयोग व्हावा म्हणून या मशिन दिल्या आहे. याचा योग्य वापर होतोय की नाही हे पाहण्याची जबाबदारी प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. सर्वसामान्य जनतेला लॉकडाउनचा फटका बसला आहेच. आता आपन दुसऱ्या लाटेतील लॉकडाउन मधून अनलॉक कडे वाटचाल करत आहोत.”
ते म्हणाले,” व्हेंटीलेटर दिली म्हणजे जबाबदारी संपली अस नाही. व्हेंटीलेटर अभावी कोणाला प्राण गमवावा लागू नये यासाठी प्रयत्न करत आहोत. शिवसेनेच्या येथील कार्यकर्त्यांनी व पदाधिका-यांनी यंत्रणेच्या पाठिशी राजाश्रय उभा करण्याच काम केले आहे. येणारी तिसरी लाट इस्लामपूर पर्यंत पोहोचू नये म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत. तूमच्या सर्वांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या सह सर्व मंत्रिमंडळ तुमच्या सोबत आहे.”
यावेळी शिवसेनेचे नेते नितीन बाणूगडे-पाटील यांच्या हस्ते मंत्री उदय सामंत यांचा शाल, श्रीफळ, फेटा देवून सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभुते, नगरसेवक शकिल सय्यद, प्रदिप लोहार, उपजिल्हा प्रमुख नंदकुमार निळकंठ, तालुका प्रमुख युवराज निकम उपस्थित होते. सागर मलगुंडे यांनी सुत्रसंचालन केले.
तर व्हेंटीलेटरचा वापर कमी व्हावा..!
शिवसेना जनतेच्या हिताचे उपक्रम राबवते. मुख्यमंत्री स्वतः दिलेली व्हेंटीलेटर योग्य ठिकाणी योग्य वेळी पोहोचली का नाही याची खातरजमा करतात. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरोग्याच्या सुविधा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात म्हणून जाणिवपूर्वक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून सांगली जिल्ह्यात वीस व्हेंटीलेटर दिले आहेत. पण कोरोना नियंत्रीत राहूदे अन् व्हेंटीलेटरचा वापर कमी व्हायला हवा अशी अपेक्षा मंत्री सामंत यांनी व्यक्त केली.