गुवाहाटी – बांगलादेशातून भारतात घुसखोरी करणाऱ्या 3 हजार 204 जणांना चालू वर्षी अटक करण्यात आल्याची माहिती भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शुक्रवारी दिली. मात्र, तो दावा बॉर्डर गार्ड बांगलादेशने (बीजीबी) फेटाळून लावला. तसे करताना बीजीबीने बांगलादेशी नागरिकांना भारतात रोजगारासाठी जाण्याची गरज नसल्याचा प्रतिदावा केला.
भारत आणि बांगलादेशची सीमा सुरक्षा दले असणाऱ्या बीएसएफ आणि बीजीबीमध्ये महासंचालक स्तरावर बैठक झाली. त्यानंतर बीएसएफचे महासंचालक राकेश अस्थाना आणि बीजीबीचे महासंचालक मोहम्मद शफिनुल इस्लाम यांची येथे संयुक्त पत्रकार परिषद झाली.
त्यावेळी अस्थाना यांनी सीमेवरून होणारी घुसखोरी आणि तस्करीसारख्या गुन्हेगारी कृत्यांची माहिती दिली. त्यावेळी बांगलादेशातून भारतात घुसखोरी होत असल्याचा इस्लाम यांनी इन्कार केला. बांगलादेशच्या विकास दरात सातत्याने वाढ होत आहे.
त्यामुळे आमच्या नागरिकांना रोजगारासाठी भारतात जावे लागत नाही. केवळ वैद्यकीय उपचारासाठी आणि नातलगांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आमचे नागरिक वैध कागदपत्रांच्या आधारे भारतात प्रवास करतात, अशी भूमिका त्यांनी मांडली. अर्थात, सीमाभागांमध्ये तस्करीसारखे गुन्हे वाढल्याचे त्यांनी मान्य केले.