मुंबई – अभिनेत्री कंगना रणौत व शिवसेनेदरम्यान चांगलंच वाकयुद्ध रंगलं आहे. सत्ताधारी पक्षातील नेते या प्रकरणी शिवसेनेची पाठराखण करताना दिसत आहेत तर विरोधकांकडून कंगनाची समर्थन करण्यात येतंय. अशातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कंगना प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना सोमय्या यांनी, “कंगना रणौतने आपलं विधान मागं घ्यायलाच हवं, तिने मुंबईबाबत विधान करीत चूक केली आहे. प्रत्येक मुंबईकर तिच्या विधानाशी असहमत आहे. मात्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तिला धमकावणं हे आपण चालू देणार नाही.” असा इशारा दिला.
कंगनाच्या कार्यालयाची मुंबई महापालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी
“राज्य सरकार राज्यातील वाढत्या करोना संसर्गाची प्रकरणं तसेच या परिस्थितीशी लढण्यासाठी बेडची उपलब्धता आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांबाबतच्या महत्वाच्या विषयांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे.” असा आरोपही सोमय्या यांनी लगावला.
तत्पूर्वी, अभिनेत्री कंगना रणौतने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबई शहरात न परतण्याची धमकी दिली असा आरोप करत “याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीची मागणी करणारे ग्रॅफिटी दिसत होते आणि आता मला उघड धमक्या दिल्या जात आहेत. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असं ट्विट केलं होत.
कंगनाच्या मुंबईबाबतीतील वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिच्यावर टीकेची झोड उठली होती. अनेकांनी कंगनाची या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, “मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी होत असते. अतिशय सक्षमपणे मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस काम करत असतात. अशा परिस्थितीत एखाद्या कलाकाराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हास्यास्पद आहे. आज मुंबई तसंच महाराष्ट्र पोलिसांच्या हाती मुंबईत सुरक्षित आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीही ते सक्षम आहेत. जर मुंबई, महाराष्ट्र सुरक्षित आहे असं वाटत नसेल तर त्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही” असं म्हंटलं होत.
मुख्यमंत्र्यांची कंगनावर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले, ‘रोजीरोटी कमावतात, नाव कमावतात…’
देशमुखांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत सोमय्या यांनी गृहमंत्री कंगनाला धमकी देत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना सोमय्या यांनी, “महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तिला धमकावणं हे आपण चालू देणार नाही.” असा इशाराही दिला आहे.