मुंबई – मुंबई बॅंक गैरव्यवहार प्रकरणात भाजप नेते प्रविण दरेकर आणि विक्रांत जहाज गैरव्यवहार प्रकरणात किरीट सोमय्या यांनी पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे; या प्रकरणात ते जर निर्दोष असतील तर चौकशीला त्यांनी घाबरण्याचे कारण नाही, कर नाही त्याला डर कशाला अशी सुचना प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी त्यांना केली आहे.
ते म्हणाले की सोमय्या पितापुत्रावर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर हे दोघेही नॉट रिचेबल आहेत. त्यांनी तोंड लपवण्याऐवजी पोलिसांच्या चौकशीला सामारे जायला हवे होते. विक्रांत बचावच्या नावाखाली सोमय्या यांनी देशभक्तीच्या नावावर लोकांची फसवणूक केली आहे.
भाजपचे दुसरे नेते प्रविण दरेकर यांनी खोटी माहिती सादर करून बॅंकेचे संचालक पद मिळवले आहे. त्यांची पोलिसांपुढे चौकशी सुरू असताना त्यांनी पोलिस स्टेशन बाहेर गर्दी जमवून वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. वंदे मातर हे पवित्र शब्द आहेत.
अनेक क्रांतीकारक ब्रिटीश सरकारच्या विरोधात आंदोलन करीत या घोषणेचा उच्चार करीत फासावरही गेले आहेत. परंतु भारतीय जनता पक्ष मात्र आरोपीला वाचण्यासाठी वंदे मातरम घोषणेचा गैरवापर करीत आहे असा आरोपही कॉंग्रेस प्रवक्त्याने केला आहे. पोलिसांवर दबाव आणणे आणि चौकशीतून पळ काढणे हा प्रकार भाजप नेत्यांनी करण्याचे कारण काय असा सवालही त्यांनी केला आहे.