मुंबई – वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या कुटुंबाने ठाकरे परिवाराशी आर्थिक व्यवहार केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या व्यवहाराची माहिती राज्यातील जनतेला द्यावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केलीये. सोमय्यांनी यांनी, ‘मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व सेना नेते रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन खरेदी केली’ असा दावा केलाय.
यावेळी सोमय्या यांनी या व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित करताना, ‘रेवदंड्याच्या पलीकडे असलेल्या किल्ल्यापासून काही अंतरावर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जमीन खरेदी केली. २१ मार्च २०१४ रोजी यासाठी व्यवहार झाला. २ कोटी २० लाख रुपयांचा हा व्यवहार होता. ठाकरे आणि वायकर यांनी नाईक कुटुंबाकडे सदर जमीन खरेदी केली. नाईक कुटुंबासोबत असे आणखी किती व्यवहार झाले? अशा किती जमिनी घेण्यात आल्या?’ असा जाब विचारला.
अन्वय नाईक यांच्या पत्नी व मुलीचे नाव असलेल्या ७/१२ वर रश्मी ठाकरे व मनीषा वायकर यांची नावं आहेत. त्यांचा या जमिनीशी काय संबंध? त्या एकत्र का आल्या? या संपूर्ण व्यवहाराबद्दल जनतेच्या मनात शंका असल्याने याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी सोमय्यांनी यावेळी केली.
शिवसेनेचा पलटवार
दरम्यान या व्यवहारामध्ये नाव आलेल्या रवींद्र वायकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, कोणी कोणाकडून जमीन खरेदी करू नये का? असा प्रश्न उपस्थित केला. ‘रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन खरेदी केली. आपण याबाबतची माहिती आयकर विभागाला, निवडणूक आयोगाला दिली आहे.. नाईक यांनी कोणामुळे आत्महत्या केली, त्याचा शोध लागायला हवा. पोलीस तो शोध घेतील, असंही ते म्हणाले.