पुणे : राज्यातील माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवा, असा आग्रह महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महसूलमंत्री बाळासोहब थोरात यांच्याकडे धरला आहे.
शासन नियुक्त समितीने शिफारस केल्यानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनुकंपासह तत्काळ भरती सुरू करावी, माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बक्षीस समितीने शिफारस केल्याप्रमाणे 10,20 व 30 वर्षांनंतरचा लाभ तत्काळ लागू करावा, माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 24 वर्षांच्या लाभाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची तत्काळ अंमलबजावणी करावी, राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या मान्यता तत्काळ देणे आदी प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या वतीने कामबंद आंदोलन सुरू आहे, असे महामंडळाचे महासचिव शिवाजी खांडेकर यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शिक्षक व पदवीधर आमदारांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे. तसेच, विविध संघटनांनीदेखील पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून या कर्मचाऱ्यांच्या पदभरतीसह अन्य प्रश्नांत लक्ष घालून ते लवकर सोडवावेत, असे साकडे घातले.
शाळा व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, विद्यार्थी यांच्या स्वच्छता व सुरक्षेच्या अनुषंगाने माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.