जम्मू – शस्त्रसंधी भंगाच्या पाकिस्तानी कुरापती नवीन वर्षातही कायम राहिल्या. पाकिस्तानी सैनिकांनी शुक्रवारी दोन वेळा भारतीय हद्दीत मारा केला. त्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, पाकिस्तानी माऱ्यात भारतीय लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले.
पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत गोळीबार करतानाच तोफगोळे डागले. त्या माऱ्याचे लक्ष्य जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा क्षेत्र ठरले.
पाकिस्तानी सैनिकांनी प्रामुख्याने भारतीय सीमा नाक्यांवर मारा केला. दुपारी आणि सायंकाळी त्या घटना घडल्या. पाकिस्तानी सैनिकांनी सरलेल्या वर्षात 5 हजार 100 हून अधिक वेळा भारतीय हद्दीत मारा केला.
दोन्ही देशांत 2003 मध्ये शस्त्रसंधी (करार) झाल्यानंतर 18 वर्षांतील तो उच्चांक ठरला. पाकिस्तानी माऱ्यात वर्षभरात 36 भारतीय मृत्युमुखी पडले, तर 130 हून अधिक जखमी झाले. मृतांमध्ये 24 शहीद जवानांचाही समावेश आहे.
पाकिस्तानी माऱ्याला जबर प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. त्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी बाजूची मोठी हानी होते. तरीही शेजारी देश वठणीवर येताना दिसत नाही. त्याची चुणूक नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिसली.