वर्षानुवर्षे दुष्काळाला तोंड देणाऱ्या माण आणि खटाव तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावायचे असतील तर मूळ पाणीप्रश्न पूर्णपणे समाधानकारकरित्या सुटायला हवा. आतापर्यंत काय झाले आणि काय नाही, याचा उहापोह करण्यापेक्षा यापुढे काय करावे लागेल, याचे नियोजन करून पुढे जायला हवे. असे केले नाही तर रोजगारासाठी स्थलांतर आणि इतर समस्यांमुळे प्रगतीची दिशा खुंटतच राहिल. त्यामुळेच आता तरी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून एकत्रितरित्या सामूहिक प्रयत्न करायला हवेत.
पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईपर्यंत लढा सुरू ठेवायलाच हवा. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे म्हणून सौर ऊर्जा प्रकल्पासारख्या पर्यायांचा विचार करून त्यासाठी प्रोत्साहन देण्याची भूमिका घेता आली तर तीही विकासाला पूरक ठरू शकते….
शेती असेल, उद्योगधंदे असतील किंवा स्थानिक पातळीवर रोजगार असेल. या आणि अशा अनेक समस्या पाण्याविना निर्माण झाल्या. माण आणि खटाव तालुक्यातील अनेक पिढ्या पाण्याच्याच प्रतीक्षेत संपल्या. आता तरी स्थानिक पातळीवर सोयीसुविधा उपलब्ध होऊन स्थिरता मिळावी, ही अनेक वर्षांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. राजकीय- सामाजिक क्षेत्रांतील धुरिणांनी एकत्रितरित्या नियोजनबद्ध प्रयत्न केले तर काही घडू शकते. तसे प्रयत्न काही जणांनी सुरू केले आहेत. दोन्ही तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनीच एकत्रित येऊन प्रश्न सोडविण्याच्या भूमिकेला प्रतिसाद द्यायला हवा.
तसे झाले नाही तर पुन्हा “पहिले पाढे पंचावन्न’ अशीच स्थिती रेगाळत राहिल. पुन्हा तेच कष्ट, तीच समस्या. गावापासून दूर जाणारा युवावर्ग. हे टाळायचे असेल तर आता हीच वेळ आहे एकत्रितपणे संघर्ष करण्याची. आपल्या मातीची तहान भागविण्याची. पाऊसमान कमी असल्याने तालुक्यांबाहेरून पाणी आणण्याचा पर्याय समोर आहे. सध्या असणाऱ्या योजनांना गती देणे आणि आणखी नव्याने काही करता येईल का, याचा विचार करून धोरणात्मक निर्णयासाठी पाठपुरावा करणे, यासाठी पुढाकार घ्यायला हवा. उरमोडीसह जिहे- कठापूर, टेंभू, तारळी या योजनांचे पाणी जलद कसे मिळविता येईल. ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचविण्यासाठीही पाठपुरावा करावा लागेल. या योजनांखेरीज आणखी पाणी मिळवण्याच्या कल्पना पुढे आल्या तर त्यालाही एकत्रित प्रोत्साहन दिले तर ते उपयुक्त ठरणार आहे. पाणीप्रश्न पूर्ण मार्गी लावण्याच्या प्रयत्नांबरोबरच सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रकल्प राबविण्यासाठीची अनुकुलता या दोन्ही तालुक्यांमध्ये आहे. काही दिवसांचा अपवाद वगळता या भागात प्रखर उन असते.
त्यामुळे सौर ऊर्जानिर्मितीला इथे खास वाव असावा हे लक्षात घेऊन पावले उचलली पाहिजेत. केंद्र व राज्य सरकारनेही असे प्रकल्प उभे करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, यासाठी पाठपुरावा करणे शक्य आहे. तसे झाल्यास पाण्याविना मोकळ्या असणाऱ्या माळरानावर सौर ऊर्जा प्रकल्पाचे सौर पॅनेल पसरले तर राज्याच्या ऊर्जानिर्मितीलाही हातभार लागेल आणि स्थानिक पातळीवर काही प्रमाणात उत्पन्नाचे साधनही निर्माण होऊ शकेल. औंधवरून गोपूजमार्गे वडूजला जाताना डाव्या बाजूच्या डोंगरावर पवनचक्क्यांच्या जोडीने सौर ऊर्जानिर्मितीसाठीचे पॅनल दिसतात. दोन्ही तालुक्यांत अशा डोंगरटेकड्यांवर आणि पाण्याविना मोकळ्या माळरानावर असे सौर पॅनेल उभे केले तर ते महत्त्वपूर्ण ठरू शकेल. जिल्ह्याच्या पश्चिम भागासह इतर ठिकाणीही पवन ऊर्जा प्रकल्पातील पवनचक्क्यांतून वीजनिर्मिती होत आहे. प्रखर उन्हामुळे वीजनिर्मितीस अनुकुलता असलेल्या माण खटावमध्ये सौर ऊर्जानिर्मितीसंदर्भात विचार व्हायला हवा. राजकीय- सामाजिक क्षेत्रातील प्रमुखांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. सातारा- सोलापूर मार्ग तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रस्तावित केलेला पुणे- बंगळुरू महामार्गही या दोन्ही तालुक्यांतून जाण्याची शक्यता आहे. दळणवळणाच्या सुविधा वाढल्यामुळे अनेक उद्योगधंद्यांची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे एकूणच सर्वांगीण विकासाची संधी मिळवायची असेल तर पाणी मिळवून उत्पन्नाचे विविध स्त्रोत स्थानिक पातळीवरच निर्माण करण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. (समाप्त)