सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यामध्ये मतदान होत आहे. सर्वच दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र मतदानावर पावसाचे सावट आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळपासून पाऊस पडत आहे. सोलापूर जिल्ह्यात तर सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे अजूनपर्यंत सोलापूरमध्ये मतदान करायला नागरिक घराबाहेर पडले नाहीत.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये चिखलाचे साम्राज्य आहे. मतदान केंद्राबाहेर चिखल झाला असून काही मतदान केंद्रात पाणी देखील साचले आहे. सोलापूरातील भवानी पेठ मतदान केंद्रावर पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे त्याठिकाणी असणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांची एकच तारंबळ उडाली. पावसामुळे मतदान केंद्रावर नागरिकांची कमी गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे सोलापूरात मतदानाच्या आकडेवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.