नगर द्वितीय : पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल 87.88 टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पुणे विभागाचा निकाल 1.7 टक्यांनी घटला आहे. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश असलेल्या पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा सर्वाधिक 88.19 टक्के निकाल लागला आहे. विभागात मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 8.77 टक्क्यांनी जास्त आहे.
पुणे विभागाचे अध्यक्ष टी. एन. सुपे आणि विभागीय सचिव बी. के. दहिफळे यांनी बारावी पुणे विभागाचा निकाल जाहीर केला. पुणे विभागातून बारावी परीक्षेस 2 लाख 40 हजार 434 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 1 हजार 11 हजार 294 असून, उत्तीर्णाची टक्केवारी 87.88 आहे. पुणे विभागातून 1 लाख 37 हजार 64 मुले बसले होते. त्यांची उत्तीणतेची टक्केवारी 84.11 आहे. तर 1 लाख 3 हजार 370 मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी 96 हजार 12 मुली उत्तीर्ण झाले असून, त्याची टक्केवारी 92.88 आहे. यंदा बारावी परीक्षेसाठी नोंदणी झालेल्या पुनर्परीक्षार्थी अर्थात रीपिटर विद्यार्थ्यांची संख्या 10 हजार 258 इतकी असून, त्यापैकी 10 हजार 241 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 2 हजार 168 असून, उत्तीर्णतेची टक्केवारी 21.17 आहे.
पुण्याचा निकाल घटला
पुणे जिल्ह्याचा बारावी निकाल गतवर्षीच्या तुलनेत 2.19 टक्क्यांनी घटला आहे. विभागात सर्वात जास्त निकाल सोलापूर, त्यानंतर अहमदनगर आणि त्यापाठोपाठ पुण्याचा क्रमांक लागतो. यंदा पुणे जिल्ह्याचा निकाल 87.65 टक्के लागला आहे. गतवर्षी पुण्याचा निकाल 89.84 टक्के होता. पुण्यात मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 83.88 टक्के, तर मुलींचे उत्तीर्णाची टक्केवारी 92.34 आहे. मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा 8.57 टक्क्यांनी जास्त आहे.