महामार्गावर जागोजागी खड्डे : अपघातांची मालिका कायम
कळस – इंदापूर तालुक्यातून जाणारा पुणे-सोलापूर महामार्ग साईडपट्टयांचा अभाव, सलग सेवा रस्त्यांचा अभाव, अस्ताव्यस्त पार्किंग व उड्डाणपुलाची उंची कमी आदी कारणांमुळे समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. कळस (ता. इंदापूर) येथून जाणाऱ्या महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा परिसर मृत्यूचा सापळा बनला आहे.
भिगवण, डाळज, काळेवाडी, पळसदेव येथून जाणाऱ्या महामार्गालगत सलग सेवारस्ते पावसाने पाणी साचल्यामुळे व महामार्गावर पडलेल्या खड्डयांच्या वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. पुणे- सोलापूर महामार्गावर रावणगावपासून पळसदेवपर्यंत दोन्ही लेनवर रस्त्याला पडलेल्या खड्डयामुळे रोज अपघात होत आहेत. यात वाहनांच्या नुकसाना बरोबरच नागरिकांचे जीव जात असताना टोल प्रशासन याकडे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही. पुणे- सोलापूर महामार्गावरील यवतपासून इंदापूरपर्यंतच्या टप्प्याचे नूतनीकरणाच्या कामाला पाच वर्ष उलटून गेली आहेत. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे पाच वर्षात रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले होते. मात्र प्रत्येकवेळी टोल प्रशासन आणि हायवे प्रशासन यांच्याकडून तात्पुरते ठिगळे लावून दुरुस्तीचे काम करण्यात आलेले आहे.
मात्र, मागील काही दिवसांपासून रावणगाव ते डाळज पळसदेव टप्प्यात खड्डयांची मालिका तयार झाली आहे. या खड्डयामुळे दिवसात एक ते दोन अपघात घडत आहेत. अचानक समोर आलेल्या खड्डयांमुळे वाहनचालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात होत आहेत. काही ठिकाणी खड्डा चुकविण्याच्या नादात दुसऱ्या गाडीशी टक्कर होऊन अपघात होत आहेत. भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर रोज एक ते दोन अपघात असल्याची माहिती मिळत आहे. याकडे टोल प्रशासन आणि हायवे प्रशासन लक्ष देताना दिसून येत नसल्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येत आहे.
याबाबत टोल प्रशासनाकडे वाहनधारकांनी तक्रार केली तरी पहिल्या कंपनीचा करार संपला असल्यामुळे नवीन कंपनीच्या ताब्यात रोडची सूत्रे गेल्याची माहिती देण्यात येत आहे. मात्र, ताबा कोणत्याही कंपनीकडे असला तरी टोल कलेक्शन थांबविण्यात येत नसेल तर दुरुस्तीचे काम का थांबविण्यात येते, असा सवाल उपस्थित होत आहे.
महामार्गाची अपघाती ओळख
अनधिकृत पार्किंग, अवैध व्यावसायिकांचे महामार्गावरील अतिक्रमण तसेच महामार्गाच्या शेजारीच भरणारे आठवडे बाजार यामुळे सर्वात अपघाती रोड म्हणून पुणे- सोलापूर महामार्गाची ओळख बनत आहे. कोट्यवधी रुपये टोलच्या माध्यमातून कमविणारी टोल कंपनी आणि यावर नियंत्रण असणारे नॅशनल हायवे प्रशासन याकडे लक्ष देत नाहीत. यामुळे अनेक गंभीर अपघात घडून अनेकांना जीवाला मुकावे लागत आहे. अनेकजण जायबंदी होत आहे. वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब बनली आहे. त्यामुळे परिसरात तासन्तास वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात. महामार्ग परिसर समस्यांनी वेढलेला आहे. रस्ते विकास मंडळ व संबंधित शासकीय विभागाने समस्यांचा विचार करून समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाल्याचे मान्य करीत खड्ड्यांमुळे अपघात होवून जीवितहानी झाल्यास सबंधित कंपनीला दोषी धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रावधान आहे. पोलीस ठाणे हद्दीत अपघात घडल्यास आपण संबंधितांवर कठोर कारवाई करणार आहे.
– जीवन माने, प्रभारी अधिकारी, भिगवण पोलीस ठाणे.