इंदापूर तालुक्यात वनविभागातील बंधारे पावसामुळे फुल
पळसदेव – वन विभागाच्या वतीने वन्य प्राण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी व वन्य प्राण्याची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्यासाठी वनमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विशेष पुढाकारातून इंदापूर तालुक्यात अनेक गावात वनक्षेत्रात माती बंधारे बांधण्यात आले आहेत. सध्या गेली तीन-चार दिवस इंदापूर तालुक्यात विविध भागात झालेल्या पावसाने हे बंधारे फुल्ल झाले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यात साठलेले पाणी वन्य प्राण्यासाठी संजीवनी ठरणार आहे.
वन विभागाच्या वतीने 2020-21 मध्ये मृद व जलसंधारण या योजनेअंतर्गत पळसदेव परिसरातील काळेवाडी वनक्षेत्रात 5, डाळज नं. 3 च्या वनक्षेत्रात 4 आणि डाळज नं. 1 वनक्षेत्रात 2 माती नालाबांध तयार केले आहेत. ही कामे उत्कृष्ट दर्जाची झाली असल्याचे वनरक्षक एस. टी. कांबळे यांनी सांगितले. वनक्षेत्रात बांधण्यात आलेले मातीबांध सध्या पाण्याने तुडुंब भरले आहेत. तसेच बांडेवाडी, डाळज नं. 1 डाळज नं. 3 येथील वनक्षेत्रात एकूण 18 हेक्टर क्षेत्रामध्ये सलग समतल चर खोदले असून त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजल साठा वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.
मृद व जलसंधारण या योजनेअंतर्गत माती बांध व समतल चर हे प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत तयार करणे, जमिनीत पाणी मुरवून भूजल साठा वाढवणे, मातीची धूप रोखणे या उद्देशाने तयार करण्यात आले आहेत. ही कामे वनपरिक्षेत्र अधिकारी इंदापूर आर. ए. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी. ए. बी. घावटे, वनरक्षक एस. टी. कांबळे यांनी करून घेतली आहेत.
पळसदेव, माळेवाडी, बांडेवाडी, काळेवाडी या भागात आणखी अशाच प्रकारचे माती बंधारे बांधणे आवश्यक आहे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य दीपाली महेंद्र काळे यांनी केली आहे. या भागात अधिक प्रमाणात मातीबांध झाल्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होईल व या भागात वास्तव्यास असलेल्या चिंकारा, मोर, ससे, लांडगे, कोल्हे, सालींदर, पिंगळा या सारखे प्राणी हा परिसर सोडून जाणार नाहीत. तरी या भागात वनविभागाने आणखी माती बंधारे बांधण्यासाठी आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी काळे यांनी केली आहे.