मुंबई : राजकारण आणि समाजकारण एकमेकांस पूरक विषय आहेत. एकनिष्ठ राहून कठोर परिश्रम घेतल्यास यश आणि केलेल्या कामाचे समाधान मिळते, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी सांगितले.
उपसभापती गोऱ्हे यांच्या शासकीय निवासस्थानी राजकीय विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी देशातील विविध भागातील इंडियन स्कूल आँफ डेमोक्राँसी या संस्थेत शिकणारे विद्यार्थी उपस्थित होते.
उपसभापती गोऱ्हे यांनी आपला जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडला. यामध्ये त्यांनी राज्यात केलेल्या समाजकार्यात, महिलांसाठीचे आंदोलन, प्रत्यक्षात तळागाळातील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. शालेय जीवनापासूनच संघटन करुन अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले.
समाज कार्याबरोबरच महिलांसाठी विशेष काम शेवटच्या घटकांपर्यंत घेऊन जाणे गरजेचे आहे. कठोर परीश्रमाबरोबर वाचन, लिखाण आणि भाषणकलाही राजकारणासाठी महत्त्वाची आहे. असे उपसभापती गोऱ्हे यांनी सांगितले.