शिरूर तालुक्यातील नागरिकांची पायपीट थांबणार
पुणे – जिल्ह्यात पाणी आणि चारा टंचाईची तीव्रता दिवसेंन दिवस वाढत आहे. सर्वाधिक टॅंकरची संख्या बारामती आणि शिरूर तालुक्यात असून, या तालुक्यातील जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्नही आता गंभीर बनला आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील पाण्याची झळ कमी करण्यासाठी श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार असून, अजून टॅंकर वाढविण्यात येणार असल्याचेही देवस्थानकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात सध्या यात्रा सुरू असल्यामुळे पाण्याअभावी त्या होवू शकत नाही. अनेक गावांनी यात्रा रद्द करून त्या खर्चातून गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील ज्या गावांमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती आहे. त्याठिकाणी अधिक टॅंकर देण्याचा निर्णय देवस्थानकडून घेण्यात आला. त्यानुसार पशुधन वाचवण्यासाठी जनावरांच्या चाऱ्याची समस्या विचारात घेत पुणे विभागाचे सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पिण्याच्या पाण्यासाठी खैरेवाडी, खैरे नगर, मिडगुलवाडी, मांदळेवाडी या परिसरात पाण्याचे टॅंकर सुरू करण्याचा तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. विजयराज दरेकर, उपाध्यक्ष प्रा. नारायण पाचुंदकर, सचिव डॉ. संतोष दुंडे, अकाऊंटंट संतोष रणपिसे, लक्ष्मण गटाप, सरपंच नवनाथ खैरे, संचालक उत्तमराव खैरे, सरपंच गणेश मिडगुले यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते. परिसरामध्ये तीव्र पाणीटंचाईची स्थिती पाहता नागरिकांनी पाण्याचा वापर योग्य व जपून करावा, असे आवाहन यावेळी देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले.