सौ. जयश्री राजकुमार कारंडे
धार्मिक, सामाजिक व राजकीय अशा सर्वच क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून रेठरे खुर्द येथील जयश्री कारंडे यांना ओळखले जाते. संत निरंकारीच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी अध्यात्माकडे वळविले आहे. आपल्या आयुष्यात अध्यात्माने जे समाधान मिळते ते कशानेही मिळत नाही असे त्या म्हणतात. त्यांनी विविध क्षेत्रातून केलेल्या विविध उपक्रमांविषयी…
लहानपणीच वडिलांच्या प्रेमाला पोरके झालेल्या परंतु आई व मामाच्या मायेच्या सावलीत मोठे झालेल्या रेठरे खुर्द येथील सौ. जयश्री कारंडे यांनी आज समाजकार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. अध्यात्मिक क्षेत्रातही त्या मोलाचे कार्य करीत आहेत.
जयश्री कारंडे यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील ताकारी-घोगाव. त्यांचा जन्म सुशिक्षित कुटुंबात झाला होता. वडिल व्यवसायाने डॉक्टर होते. परंतु त्या लहान असतानाच त्यांचे वडिल गेल्याने. त्यांच्या कुटुंबात पोकळी निर्माण झाली. त्यानंतर त्यांच्या आई आपल्या दोन मुलींना घेऊन काले ता. कराड येथे माहेरी राहू लागल्या. मामाचा आधार होता परंतु वडिलांचे छत्र डोक्यावर नसल्यामुळे अनेक संकटांना पार करत त्या दोघीही मोठ्या झाल्या.
1990 साली रेठरे खुर्द येथील राजकुमार कारंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ते पोलीस होते. परंतु पोलीस हे कडक स्वभावाचे असतात अशी भावना जयश्री यांची झाल्याने त्यांना पोलीस खात्यातील नवरा नको होता. परंतु विवाहनंतर राजकुमार यांच्या मृदू व शांत स्वभावामुळे जयश्री यांचे मतपरिवर्तन झाले. सासरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे सुरूवातीला अनेक प्रसंगांना सामोरे जात त्यांनी आपल्या संसाराचा गाडा चालविला. सासरे ग्रामपंचायत निवडणूक लढवित असल्याने तसा राजकीय वारसाही होता. परंतु त्याकडे जास्त करून कोणी वळले नाही.
मुळातच अध्यात्माची आवड असणाऱ्या जयश्री या 1996 साली अध्यात्मिक क्षेत्रात वळल्या. संत निरंकारीच्या माध्यमातून सत्संग घेणे महिलांना समुपदेश करणे त्यांनी सुरू केले. यामुळे अनेकांच्या प्रश्नांचे निर्मूलन झाले. मुर्तीमध्ये देव नसून माणसांमध्ये देव आहे. त्यामुळे माणसांवर प्रेम करा असा संदेश त्यांनी दिला. हे करत असतानाच चर्मकार समाजाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. या माध्यमातून सावित्रीबाई फुले जयंती, घरकुल योजनांची माहिती त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना सहकार्य केले. त्यांच्या कार्यामुळे चर्मकार संघाने पश्चिम महाराष्ट्र चर्मकार संघाच्या अध्यक्षपद त्यांना दिले.
या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबविले. त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपाच्या कराड तालुका महिला अध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली. या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. जनधन योजना, बेटी बचाओचा नाराही त्यांनी दिला. याच बरोबर संत निरंकारीच्या माध्यमातून हळदी-कुंकू, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम तालुक्यातुील समुारे 102 गावात त्यांनी राबविले आहेत.
त्याचबरोबर पती-पत्नींनी मिळून मुंबई येथील सुमारे 105 दाम्पत्यांना घटस्फोट घेण्यापासून परावृत्त केले आहे. त्यांचे सामाजिक कार्य अलौकिक असेच आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात अध्यात्माशिवाय पर्याय नाही. जी व्यक्ती अध्यात्मात येईल ती सुखी व समाधानी होईल असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावात संत निरंकारीच्या माध्यमातून त्या मेळावे घेत आहेत. अनेक गावातील महिला घरघुती कारणांमुळे त्रस्त आहेत. त्यांना त्यातून बाहेर काढून एक आधार देण्याचे काम व त्यांचे मन अध्यात्मात गुंतविण्याचे काम त्या करत आहेत. याचा अनेक महिलांना लाभही झाला आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिमागे अनेक महिला खंबीरपणे उभ्या आहेत.