जयेश राणे
आपण कोणतीही कृती करताना एक लोकप्रतिनिधी आहोत याचे भान लोकप्रतिनिधींना असले पाहिजे. बंगाली अभिनेत्री आणि खासदार असलेल्या लोकप्रतिनिधीने सोशल मीडियावर मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत असल्याची काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. ती पाहताना न रुचणारी अशीच आहेत.
सोशल मीडियावर छायाचित्र पोस्ट केलेले न पटलेल्या मंडळींनी त्या महिला लोकप्रतिनिधीला “संसदेत जाऊन काम करा, असा सल्ला दिला आहे. त्या छायाचित्रांप्रकरणी ट्रोल झाल्यावर माफी मागितली तरी त्यामुळे झालेले वैचारिक प्रदूषण कसे दूर करणार? त्यांनी इन्स्टाग्रामवर बरेच फोटो पोस्ट केले आहेत. खासदार झाल्या असल्या तरी त्या अभिनेत्रीच्या कोषातून बाहेर आलेल्या नाहीत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेली काही छायाचित्रं लक्षात घेता या खरंच लोकांनी निवडून दिलेल्या खासदार आहेत का? असा प्रश्न पडतो.
महिलांवरील अत्याचारांचा पाढा वाचावा तितका कमीच आहे, अशी स्थिती आहे. नुकतेच निधन झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आदी उच्चपदावर कार्यरत राहिलेल्या स्त्रिया आठवल्या की, सर्वप्रथम त्यांच्या साडीतील वेशाचे स्मरण होते. संसदेतील या माजी लोकप्रतिनिधींकडून, एका सर्वोच्च पदावरील स्त्रीकडून आपली वेशभूषा सर्वठिकाणी कशी असावी याची शिकवण घेण्याचे सौजन्य दाखवतील का? त्या लोकप्रतिनिधीने जी चूक केली आहे. तशी चूक लोकप्रतिनिधी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांनी कृपया करू नये! कारण या गोष्टी जनतेच्या कायम लक्षात राहतात.
आपण मतदार संघात जाताना, संसदेत जाताना केवळ लोकप्रतिनिधी असतो, असे नाही तर जगभरात कुठेही गेलो तरी भारतातील एक लोकप्रतिनिधी म्हणूनच वावरलेले अधिक योग्य असणार आहे. एक लोकप्रतिनिधी सोशल मीडियावर मॉडेलप्रमाणे स्वतःची छायाचित्रे प्रसारित करतात, यातून काय बोध घ्यावा? अन्य महिला लोकप्रतिनिधींनी त्यांना त्यांच्याकडून झालेल्या चुकीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. तसे कोणी केल्यास प्रांजळपणे ती चूक स्वीकारून त्यात बदल ही करणे अपेक्षित आहे.
उत्तान दृश्य, इंटरनेटवर पसरलेले अश्लीलतेचे मायाजाळ या सर्व गोष्टींनी समाजाची नीतिमत्ता, नैतिकता रसातळाला जात आहे किंबहूना गेली आहे. त्यामुळे विचार क्षमता दुर्बल झाल्याने ज्यांचा या अश्लीलतेशी काडीमात्रही संबंध नाही त्या स्त्रिया वासनांधांच्या वासनेच्या शिकार होत आहेत. हे किती दुर्दैवी आहे? यातच एक महिला लोकप्रतिनिधीची मॉडेलप्रमाणे छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित होतात याला काय म्हणावे? याचे उत्तर त्या लोकप्रतिनिधीनेच दिलेले चांगले. किंबहुना त्यांच्याकडून ते उत्तर नागरिकांनी घेतले पाहिजे. निवडणुकीवेळी मतदारांसमोर जाताना योग्य पेहरावात गेले होते. मात्र निवडून आल्यावर कशा प्रकारे त्याच पेहरावात बदल होतो हे लक्षात आले असेलच! हा फार मोठा विरोधाभास आहे. कोणत्याही स्त्रीला आपल्या अब्रूशिवाय सर्वांत मौल्यवान असे काहीच नसेल. यातच सर्व आले.
महिलांच्या असुरक्षिततेविषयी नुकत्याच घडलेल्या घटना भयंकर आहेत. अशा घटना विविध ठिकाणी स्त्रियांच्या बाबतीत घडतच असतात. त्याविषयी आवाज उठवायचा सोडून सोशल मीडियावर सक्रियता दाखवून काय होणार आहे? असे करून मतदारसंघाचे कल्याण होणार आहे का? उंटावरून शेळ्या न हाकता प्रत्यक्ष जनसंपर्क कसा ठेवता येईल याकडे लक्ष असले पाहिजे. त्यांच्या माहितीसाठी नुकत्याच घडलेल्या दोन घटना समोर आणत आहे. धावत्या रेल्वेत पोलिसानेच महिलेवर बलात्कार करणे, तर रेल्वे प्रवासात गुंगीच औषध मिसळून कॉलेजच्या विद्यार्थिनीची छेड काढण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही घटना रेल्वे प्रवासातील आहेत.
तिहार तुरुंगातील एका कैदी महिलेवर पोलीस कर्मचाऱ्यानेच धावत्या रेल्वेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नवी दिल्लीत घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत दिल्ली-रांची राजधानी एक्सप्रेसमधील तिकीट तपासणीस आणि पॅंट्री स्टाफकडून प्रवासी विद्यार्थिनीची छेडछाड करण्यात आली. रेल्वेने याप्रकरणी चौकशीचा आदेश दिला आहे. दरम्यान, तिकीट तपासणीसला निलंबित करण्यात आलं असून, वेटरला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
देशातील रेल्वेचे जाळे विस्तीर्ण आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित कसा होईल याकडे रेल्वेने लक्ष दिले पाहिजे. तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक बदलांच्या साहाय्याने रेल्वे कात टाकत आहे, हे नक्कीच स्वागतार्ह आहे. यासह सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीनेही कोणत्या उपाययोजना करता येतील? याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून रेल्वे मंत्रालयाला एक पत्र लिहून या घटनांत लक्ष घालण्याची मागणी त्या लोकप्रतिनिधी करतील का? किमान एक स्त्री म्हणून तरी दुसऱ्या स्त्रीच्या साहाय्याला स्वतःला जसे शक्य आहे, त्या प्रकारे धावून जाण्याचा आटापिटा त्यांच्याकडून होईल का?