इस्लामाबाद – फाळणीच्या वेळी झालेल्या हिंसाचारात कुटुंबापासून विभक्त झालेली बहीण 75 वर्षांनंतर प्रथमच कर्तापुर येथे आपल्या भावांना भेटली. एका शीख कुटुंबात जन्मलेल्या या मुलीला मुस्लीम जोडप्याने दत्तक घेतले आणि वाढवले, ती भारतातून आलेल्या तिच्या भावांना इतक्या प्रदीर्घ अवधीनंतर प्रथमच भेटली. बुधवारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील करतारपूर येथे ही भेट झाली.
फाळणीच्या वेळी, शीख कुटुंबात जन्मलेली मुमताज बीबी ही एक अर्भक होती जी तिच्या आईच्या हत्येमुळे पोरकी झाली होती. फाळणीच्या हिंसाचारात तिची हत्या झाली होती. त्यानंतर मुहम्मद इक्बाल आणि अल्ला राखी नावाच्या जोडप्याने या मुलीला दत्तक घेतले आणि तिला स्वतःची मुलगी म्हणून वाढवले, तिचे नाव मुमताज बीबी ठेवले.
फाळणीनंतर, इक्बाल पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखुपुरा जिल्ह्यातील वरिका तियान गावात स्थायिक झाला. इक्बाल आणि त्याच्या पत्नीने मुमताजला ती आपली मुलगी नसल्याचे सांगितले नाही. दोन वर्षांपूर्वी इक्बालची तब्येत अचानक बिघडली आणि त्याने मरणशैय्येवर असताना मुमताजला सांगितले की ती आपली खरी मुलगी नाही आणि ती भारतातील एका शीख कुटुंबातील आहे.
इक्बालच्या मृत्यूनंतर मुमताज आणि तिचा मुलगा शाहबाज यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला. त्यांना मुमताजच्या खऱ्या वडिलांचे नाव आणि पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील गाव (सिद्राना) माहित होते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबे एकमेकांशी जोडली गेली. त्यानंतर मुमताजचे भाऊ गुरुमीत सिंग, नरेंद्र सिंग आणि अमरिंदर सिंग कुटुंबातील इतर सदस्यांसह करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबमध्ये पोहोचले. मुमताज तिच्या कुटुंबीयांसह तेथे पोहोचली आणि तेथे 75 वर्षांनंतर तिच्या हरवलेल्या बहिण आणि भावांची भेट झाली.