भौतिक सुविधांच्या मागे धावणाऱ्या तरुणाईचे भान सुटले : व्यापक प्रबोधनाची गरज
विशाल वर्पे
केंदूर – गेल्या दहा ते बारा वर्षांत सोशल मीडियाने संपूर्ण जग व्यापून टाकले आहे. त्याचा परिणाम विधायक पद्धतीने सुरू झाला. परंतु याच सोशल मीडियातून विघातक प्रवृत्ती डोकावू लागली. त्यामुळे नैतिकतेचे धडे देणाऱ्या समाजघटकांपुढे आव्हान बनले आहे. याच माध्यमातून नैतिकतेचे धडे देण्याऐवजी त्यातून वाममार्गाला जाणारी तरूणाई डोळ्यादेखत धिंडवडे काढत आहे. त्यामुळे सोशल मीडियामुळे नैतिकता ओशाळली, असेच म्हणावे लागेल. भौतिक सुविधांच्या मागे धावणाऱ्या तरूणाईचे भानच सुटले असल्याचे “अधोरेखित’ होत आहे. त्याचा परिणाम समाजस्वास्थ बिघडत आहे. यावर व्यापक प्रबोधन करण्याची गरज आहे. तरच समाजाची पत्रिका सदृढ होण्यास मदत होणार आहे.
1992 नंतर जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. त्याचबरोबर बहुराष्ट्रीय कंपन्यांचा शिरकाव झाला. एरव्ही माहिती आणि तंत्रज्ञानाचे क्षेत्र सिमित होते. त्यानंतर विविध वृत्त आणि मनोरंजन करणाऱ्या वाहिन्यांचा सुळसुळाट झाला. अवघ्या नऊ ते दहा वर्षांत टेलिव्हिजन वाहिन्यांनी आपले बस्तान बसविले. टेलिकॉम क्षेत्रातील क्रांतीची फळे आता चाखायला मिळू लागली होती. मोबाइलची क्रांती उदयाला आली. गर्भश्रीमंतांच्या हातातच हे मोबाइल दिसत होते. त्यावेळी त्याची व्याप्ती मर्यादित होती. सर्वसामान्यांना त्याचा फारसा लाभ मिळत नव्हता. मात्र, 2000 नंतर मोबाइल विश्व व्यापून जाऊ लागले. त्यानंतर 2010 नंतर सोशल मीडियाचा उदय झाला. अवघ्या नऊ वर्षांत सोशल मीडियाने बरीच क्रांती केली आहे. फेसबुक, व्हॉट्सऍप, ट्टिवटर, टिकटॉकपर्यंत झेप घेतली. त्यामुळे सोशल मीडियातील फेसबुक आणि व्हॉट्सऍप संपूर्ण जग मुठीत आल्याचा भास तरूणाईला झाला. त्यातूनच विधायक पध्दतीने सोशल मीडियाने कात टाकली.
देशाच्या एका टोकाला राहणाऱ्या तरूणाईला सोशल मीडियामुळे एकाच धाग्या गुंफून टाकले. मात्र, याच विधायक आवृत्तीतून विघातक प्रवृत्तींनी शिरकाव केला. भान सुटलेल्या तरूणाईने नैतिकताच पायदळी तुडविली. त्यामुळे सोशल मीडियातून फसवणूक आणि महिला, तरूणींवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ होत आहे. दरदिवशी देशभरात डझनभर घटना घडत आहेत. त्यामुळे समाजात विषमता निर्माण होत आहे. तसेच पोलिसांवर वाढता ताण पडत आहे. सोशल मीडियावर वॉच ठेवण्यासाठी तसेच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. फेसबुक, व्हॉट्सऍपच्या माध्यमातून आतापर्यंत महिला, तरूणींना टार्गेट करण्यात आले आहे. त्यातून टोकाला गेलेली अनैतिकता ही समाजासाठी शरमेची बाब आहे. तरूणांमध्ये टोकाची प्रवृत्ती वाढली असल्यामुळे नैतिकता ओशाळली आहे.
दुहेरी अस्त्र घातक ठरतेय
सोशल मीडिया हे दुहेरी अस्त्र आहे. यातून विधायक उपक्रमांची प्रचिती आतापर्यंत उमटली आहे. मात्र, त्याचबरोबर या सोशल मीडियामुळे अनेक उपक्रम, प्रबोधनाची कास धरली जात आहे. हे दुहेरी अस्त्र हे समाजात चांगल्या पद्धतीने चालत असताना त्यातून विघातक आणि समाजभान दूषित करणारे घटक सरसावले. त्यामुळे तरूणाईने ताळच सोडला आहे. तरूणी, महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण हे सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ लागले. त्याचा समाजमनावर विपरित आणि दूरगामी परिणाम होत असताना सामाजिक घटकांसमोर आव्हानच बनले आहे.