विकासकामे केली तर फलकांची गरज काय? नेटिझन्सचा सवाल
कर्जत – जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मतदारसंघातील कर्जत-जामखेड तालुक्यातील गावागावात विकास कामांचा हिशोब देणारे फ्लेक्स लावले आहेत. यामध्ये गेल्या दोन टर्ममध्ये केलेल्या सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामांचा लेखाजोखा मांडलेला आहे. मात्र अपूर्ण कामे, कामांचा निकृष्ट दर्जा आदी मुद्दे घेत या फ्लेक्सबाजीवर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे.
ना. शिंदे यांनी गावागावातील विविध कामांवर कोट्यवधी रुपयांच्या निधीचा कालावधीनिहाय लेखाजोखा फ्लेक्समधून मांडला आहे. “काम दमदार राम शिंदे पुन्हा आमदार’ अशी टॅगलाईन फ्लेक्सवर झळकत आहे. गावागावातील दर्शनी भागात मोठ्या आकाराचे हे फलक लावण्यात आलेले आहेत. फलक लावल्यापासून ग्रामस्थांनी फलकावरील विकास आणि गावात प्रत्यक्ष झालेली कामे याची शोधाशोध करायला सुरुवात केली आहे. कामांचे भूमिपूजन झाले मात्र काम सुरू नाही, अर्धवट अवस्थेतील बंद कामे, निकृष्ट दर्जाची कामे अशा अनेक मुद्द्यावर गावात चर्चा सुरू आहे.
काही गावात तर ग्रामस्थांना झालेल्या काही कामांचा अद्यापही तपास लागलेला नसल्याचे सोशल मीडियातील प्रतिक्रियेतून दिसत आहे. पालकमंत्र्यांच्या कित्येक भाषणातून दमदार कामगिरी केल्याचा दावा होत असला तरी प्रत्यक्षातील चित्र मात्र तितकेसे समाधानकारक दिसत नाही. तुकाईला चारीऐवजी पाईपलाईनद्वारे पाण्याचे नियोजन केल्याने यावरही सडकून टीका केली जात आहे. तुकाई चारीच्या मुद्द्यावर समाजसेवक बाळासाहेब सूर्यवंशी यांचे कित्येक महिन्यांपासून तहसील कार्यालय येथे सुरू असलेले सत्याग्रही आंदोलन आजही सुरूच आहे.
पालकमंत्र्यांनी फ्लेक्सबाजी केल्याने अनेक गावांमध्ये ठेकेदार व गावपुढारी यांचीही तारांबळ उडाली आहे. कामाचा निकृष्ट दर्जा, अर्धवट अवस्थेतील कामे, कामे सुरू नसणे अशा मुद्द्यांवर सोशल मीडियातून जोरदार टीका सुरू आहे. जिल्हा परिषदेकडून झालेली झालेली कामेही पालकमंत्र्यांनी फ्लेक्सवर घेतल्याने त्यावरही टीका होताना दिसत आहे. काही गावांमधील फ्लेक्स गायब झाल्याची माहिती सोशल मीडियातून समोर येत आहे.
करमनवाडीतील एका युवकाने तर पालकमंत्र्यांना जाहीर आव्हान केले आहे. करमनवाडी गावात लावलेल्या फ्लेक्सवरील विकासकामे पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन दाखवावीत आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करु अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या फ्लेक्सबाजीवर गावागावात उलट-सुलट चर्चा असून नेटिझन्सकडून टीकेची झोड उठवली जात आहे. विकासकामे केली तर फलकांची गरज काय ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
तुकाई चारीला पाटानेच पाणी मिळाले पाहिजे. यासाठी 77 वर्षाचे बाळासाहेब सूर्यवंशी हे 28 महिन्यांपासून सत्याग्रही आंदोलन करीत आहेत. परंतु पालकमंत्र्यांनी तुकाई चारीला उपसा पद्धतीने मंजुरी देत 21 गावांची फसवणूक केली आहे. कामे पूर्ण झाली नसतानाही गावागावात फलक लावत पालकमंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे.
कमलाकर शेटे , कार्यकर्ते, युवक क्रांती दल