विलास पंढरी
संपूर्ण भारताच्या इतिहासात धर्म हा देशाच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. आपल्या देशात काही सण सर्वत्र साजरे होतात. राज्य बदलताच रित बदलते पण सण साजरा करण्यातील उत्साह मात्र तसाच असतो. तसेच मतभेद विसरून गोड बोलायला शिकवणारा, सर्व धर्मियांनी साजरा करावा असा आगळावेगळा सण म्हणजे मकरसंक्रांत.
आपला देश शेतीप्रधान असल्याने हाही सण शेतीशी निगडित असल्याचे दिसून येते. मकरसंक्रांत हा सण पौष महिन्यात येतो. सौर कालगणनेशी संबंधित हा एक महत्त्वाचा भारतीय सण. आपली संस्कृती ही कृषीप्रधान असल्याने या दिवसांमध्ये शेतात आलेल्या धान्याचे, फळांचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभऱ्याचे घाटे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवालाही अर्पण करतात.
दरवर्षी 21-22 डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण म्हणजे उत्तरेकडे सरकणे सुरू होते. इंग्रजी वर्षाच्या सुरुवातीस सूर्य मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करतो. त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणण्यात येऊ लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात 21-22 डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे सूर्याच्या मकरसंक्रमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करताना 4 मिनिटांचा फरक पडतो. त्यामुळे संक्रमणाची तारीख पुढे पुढे जात आहे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे 21-22 डिसेंबरलाच सुरू झालेले असते. पृथ्वीवरून पाहिले असता 21-22 डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकू लागते. इंग्रजी महिन्यानुसार हा दिवस बहुधा 14 जानेवारी रोजी येतो. मात्र शंभर वर्षात एक दिवस हा सण पुढे गेल्याचे दिसते.
हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो. महाभारतात पितामह भीष्म युद्धात जखमी झाल्यावर बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पाहत पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. त्यांनी या दिवशी उत्तरायण सुरू होताच प्राणत्याग केला अशी कथा प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. पहिल्या दिवसास भोगी म्हणतात. यादिवशी अनेक भाज्या एकत्र करून पौष्टिक भाजी बनवतात. ग्रामीण भागात याला “खेनाट’ किंवा “खेंदाट’ म्हणतात. तर शहरवासीयांनी या भाजीला “लेकुरवाळी भाजी’ असे गोड नाव दिले आहे. इंग्रजीचे मराठीवर झालेल्या आक्रमणाने हल्ली या भाजीला मिक्स व्हेज असेही म्हटले जाते. दुसरा दिवस संक्रांत व तिसरा दिवस किंक्रांत अशा प्रकारे साजरा केला जातो. संक्रांतीस आप्तस्वकियांना आणि मित्रमंडळींना तिळगूळ आणि स्त्रियांना वाण वाटून “तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. या दिवशी भोगी करणे, वाण- वसा, ओवसायला जाणे या सारख्या रिती, परंपरा आजही जोपासल्या जातात. महाराष्ट्रातील विविध मंदिरांमध्ये महिला वाण देतात. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातसुद्धा सकाळपासून महिला भाविकांची एकच घाईगर्दी दिसून येते. रुक्मिणी माता मंदिरात महिला एकमेकींना वाण मोठ्या श्रद्धेने देतात.
तीळ आणि गूळ हे दोन्हीही उष्ण पदार्थ आहेत. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ उपयुक्त असते. तसेच उष्ण असल्याने बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात या निमित्ताने केला जातो. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री. या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे असा उदात्त हेतू या सणामध्ये दडला आहे.
या निमित्ताने आधुनिक आहारशास्त्रीय दृष्टिकोनातून तिळाचं महत्त्व पहायला हवे.तिळात कॅल्शियम मॅंगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, शरीराला आवश्यक असलेली “बी’ गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत.
तिळातील कॅल्शियम हाडांच्या मजबुतीसाठी उपयोगी तर आहेच, शिवाय तिळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते. वृद्धांना व स्त्रियांना याचा खूप फायदा होऊ शकतो. ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे किंवा मेनोपॉजमुळे हाडांचा ठिसूळपणा वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, त्यांच्यासाठी तीळ खाणे फार उपयोगी आहे.
तिळातील लोह आणि कॉपर शरीरातील लोहाच्या अभिशोषणास मदत करते व संधीवातासारख्या विकारांवर उपयुक्त ठरते. या गुणधर्मामुळेच तिळाचं तेल मसाजसाठी वापरले जाते. तिळात ऍन्टीऑक्सिडंट्सदेखील अधिक असतात. ऍन्टी ऑक्सिडंट्स आपल्याला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात आणि वाढत्या वयामुळे त्वचेवर पडणाऱ्या सुरूकुत्यांचं प्रमाण कमी करतात. म्हणूनच पूर्वीपासून तीळ आणि तिळाचे तेल तारुण्य टिकवण्यासाठी वापरत असावेत. म्हणून हा सण म्हणजे विज्ञान, धार्मिकता, सामाजिक समरसता आणि आरोग्यवर्धन यांचा सुंदर मिलाफ
म्हणता येईल.