मुंबई – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या गावामध्ये दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडीत महिलेचा काल दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूनंतर तिचे शव परिवाराकडे सुपूर्द न करता उत्तर प्रदेश पोलिसांनी परस्पर दहन केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पीडीतेचा मृत्यू आणि त्यानंतर प्रशासनाने दाखवलेली मुजोरी यांमुळे संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी या प्रकरणाची तुलना दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाशी केली आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सामूहिक बलात्कार प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत भाष्य करताना पाताळ यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये माध्यम प्रतिनिधी उत्तर प्रदेश पोलिसांना धन करण्यात आलेला मृतदेह बलात्कार पीडितेचा आहे का? असं विचारत आहेत. मात्र उपस्थित पोलीस अधिकारी याबाबत कोणतीही माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देताना दिसत आहे.
जयंत पाटील यांनी हा व्हिडीओ शेअर करत योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. ते लिहतात, “कुटुंबियांच्या गैरहजरीत बलात्कार पीडितेच्या मृतदेहावर रातोरात अंतिम संस्कार करण्यात आले. उत्तर प्रदेश सरकारचे हे वर्तन अमानवी व अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. हे सरकार ना मुलींना जिवंत असताना सन्मान देऊ शकतंय ना मृत्यू पश्चात.”
“मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात. मात्र त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घ्यायला हवी. जर ते राज्याचा कारभार न्याय, सन्मान आणि समतेच्या आधारावर चालवू शकत नसतील तर त्यांना छत्रपतींचे नाव घेण्याचा काहीही अधिकार नाही.” अशी भूमिका पाटील यांनी मांडली.
घरवालों के गैरहाजिरी में भारत की बेटी के शव पर रातोंरात अंतिम संस्कार कर दिये गये। उत्तर प्रदेश सरकार का यह बरताव अमानवीय एवं दुर्भाग्यपूर्ण है। बेटीयों को न जितेजी सन्मान दिया जा रहा है, न मरनेके बाद। #HathrasHorrorShocksIndia #Hathras #ShameOnYogi https://t.co/hgXs1K5R6R
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) September 30, 2020
गृहमंत्र्यांनीही योगींना सुनावले
हाथरस सामूहिक ब्लात्कार प्रकरणावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दुःख व्यक्त करताना उत्तर प्रदेश सरकारलाही खडे बोल सुनावले. ‘फिल्म सिटी’ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर भर द्या असा सल्ला देत देशमुख यांनी योगी सरकारची कानउघाडणी केली.
याबाबत देशमुख यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून #यूपी_की_निर्भया_को_न्याय_दो या हॅशटॅगसह ट्विट करताना, “उत्तरप्रदेश येथील हाथरसमधल्या सामुहिक बलात्कारातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी गुन्हेगारांना शासन करा. पण ‘फिल्म सिटी’ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल.” अशी भूमिका मांडली.
#उत्तरप्रदेश येथील हाथरसमधल्या सामुहिक बलात्कारातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. @myogiadityanath गुन्हेगारांना शासन करा. पण ‘फिल्म सिटी’ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल. #यूपी_की_निर्भया_को_न्याय_दो
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 29, 2020