पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात व्यक्तिगत बैठक पार पडली आहे. या बैठकीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
“वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहोत”, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं. ते पुण्यात बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत झालेल्या बंद दाराआढ बैठकीमुळे चंद्रकांत पाटलांच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झालं आहे.
वाघाशी आमचं कधी शत्रुत्व नव्हतच. मोदीजींशी जुनी मैत्री असल्याचं उद्धव यांनी सांगितलं. त्यांचं म्हणणं फडणवीस-पाटलांशी जमत नाही. इकडे दोस्ती असती तर 18 महिन्यापूर्वीच सरकार आलं असतं. तरी मोदींनी जर सांगितलं, त्यांची इच्छा असेल तर त्यांची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा. मोदींजींनी आदेश दिल्यावर काय वाटेल ते करु, असं पाटील यांनी म्हटलं. त्यावेळी त्यांनी सरकार आलं तरी निवडणुका वेगळ्याच होणार, असंही म्हटलं.