“स्वाभिमानी’चे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे मत
पुणे -“शिक्षण, आरोग्यासारख्या मूलभूत सुविधांवर भर देऊन त्याचा प्रचार केला आणि जर चांगला प्रशासक लाभला, तर मतदारही जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करतो, हे दिल्लीच्या निकालातून स्पष्ट होत आहे,’ असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे सांगितले.
पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता, शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. “भाजपने जाती-धर्मांत तेढ निर्माण करुन मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न दिल्लीत केला, पण आम आदमी पक्षाने तो हाणून पाडला. आप आणि स्वाभिमानीचे जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आमची मैत्री नैसर्गिक आहे त्यामुळे आम्ही एकत्र येऊ शकतो, असेही शेट्टी यांनी सांगितले.
शेट्टी म्हणाले, भाजपने कर्जमाफी केल्याची थाप मारली, पण शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी सत्तेवर येण्यापूर्वी “शेतकऱ्याच्या सातबारा कोरा करू’ असे सांगितले होते. या सरकारने केलेली कर्जमाफी ही तकलादू आणि बिनकामाची आहे. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. ग्रामीण विद्यार्थी आणि शहरी नागरिक यांच्यात प्रेमाचे संबध निर्माण व्हावेत, म्हणून संघटनेकडून व्हॅलेन्टाईन डे साजरा केला जाणार आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.