नवी दिल्ली : केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपचे अनेक नेते रोज नवनवीन वादग्रस्त वक्तव्य करण्यात अग्रेसर आहेत. कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून भाजप नेते वादात अडकताना दिसतात. आता असाच एक मंत्री पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यात अडकला आहे. वंदे मातरम ज्यांना म्हणणे मान्य नसेल त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय सारंगी यांनी केले आहे. सारंगी हे मोदींच्या मंत्रीमंडळात पशुपालन राज्यमंत्री आहेत.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरविषयीच्या 370 कलम रद्द करण्याच्या मुद्यावर एक सभा आयोजित करण्यात आली होती. याच सभेत बोलताना सारंगी यांनी वंदे मातरम्चा मुद्दा उपस्थित केला आहे. ज्यांना वंदे मातरम् म्हणण्यास हरकत असेल त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही अशी आक्रमक भूमिका यावेळी त्यांनी मांडली. या सभेत सरकारकडून कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर कॉंग्रेसने घेतलेल्या भूमिकेचा देखील समाचार घेतला. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलम 370 रद्द केले त्यावेळी सरकारच्या विरोधात असणारे पक्ष सर्वच सरकारच्या बाजूने उभे राहिले परंतु, कॉंग्रेसने मात्र त्याला विरोध केला असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आता पाकव्याप्त काश्मीर परत मिळवू अशी घोषणा केल्याचाही उल्लेख सारंगी यांनी केला. तसेच कलम 370 चा निर्णय हा 72 वर्षापुर्वीच घेणे अपेक्षित होते परंतु, कॉंग्रेसला जे 72 वर्षांत जमले नाही ते फक्त मोदी सरकारने करून दाखवले असल्याचा दावादेखील सारंगी यांनी केला आहे.