पुणे -साखर कामगारांसंबंधी सरकारने येत्या 15 दिवसांत त्रिपक्षीय वेतन समिती स्थापन करावी. साखर कामगारांची उपासमार सुरू असून सरकारने हा प्रश्न त्वरीत निकाली काढवा, अन्यथा येत्या गळीत हंगामात साखर कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा साखर कामगारांनी दिला.
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्यावतीने साखर आयुक्तालयावर बुधवारी (दि. 28) मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, राज्य सरचिटणीस शंकरराव भोसले, कॉ. सुभाष काकुस्ते, राज्य कार्याध्यक्ष राऊ पाटील, राज्य उपाध्यक्ष अशोक बिराजदार, डी. बी. मोहिते, खजिनदार रावसाहेब भोसले, राजेंद्र तावरे, सुरेश मोहिते, नितिन बेनकर आदी सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना मागण्याचे निवेदन दिले.
तात्यासाहेब काळे म्हणाले, साखर कामगारांच्या वेतनाबाबतची त्रिपक्षीय समितीची मुदत संपून 5 महिने झाले आहेत. तरी अजूनही नवी समितीची निवड झालेली नाही. सरकारने नवीन समिती स्थापन करून कामगारांचे प्रश्न सोडवावेत.
साखर कामगारांचा प्रश्न माझ्या अखत्यारीत येत नसून तो कामगार आयुक्त यांच्या अंतर्गत आहे. कामगारांचे निवेदन घेऊन ते कामगार आयुक्तांना पोहोचवून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू.
– शेखर गायकवाड, साखर आयुक्त, साखर आयुक्तालय