कराड – छत्रपती शिवाजी महाराज यांचा पेशवाईने अनेकदा अवमान केला आहे; हा इतिहास आहे. आज पुन्हा छत्रपतींबद्दल राज्यपाल भगतसिह कोश्यारी व भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी अपमानास्पद वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे ही पेशवाईच नाही का? याचा अभ्यास करण्याची, तसेच शिवशाही व पेशवाई यांच्यातील एकाची निवड करण्याची वेळ आली आहे, असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी व्यक्त केले.
कराड येथे शनिवार दि. 3 रोजी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांचा रोज अपमान करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. राज्यात नव्हे तर देशात छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेकदा अपमान करणे म्हणजे ही पेशवाई आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
ते म्हणाले, महाराष्ट्रासह देश आणि जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मोठा वर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा वारंवार अपमान करणे ही पेशवाईच आहे. प्रवक्त्याची भूमिका ही पक्षाची भूमिका असते. मात्र, भाजपचे केंद्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ताळतंत्र सोडून वक्तव्य केली असून महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना त्यांची भूमिका मान्य आहे का? असा सवाल करून त्यांना हे मान्य नसेल; तर त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा राज्यातील भाजप नेत्यांनी विरोध करावा. अन्यथा, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असेही आव्हान त्यांनी यावेळी केले.
… महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे काम
गुजरात व कर्नाटककडून सध्या महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्याची भाषा करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर यापूर्वीच मी मोदी-शहांचा हस्तक असल्याचे सांगितले असून केंद्राच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव सुरू आहे. मात्र, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे होऊ देणार नाही.
संविधान बचाव पदयात्रेस प्रतिसाद
कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शनिवार दि. 3 रोजी येडे मच्छींद्र ते कराड अशी संविधान बचाव पदयात्रा करण्यात आली. सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास या यात्रेचे कराड शहरात आगमन झाले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या पदयात्रेची सांगता करण्यात आली. याठिकाणी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, या यात्रेत कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याने पदयात्रेस चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.