नवी दिल्ली,- करोनाची तिसरी लाट आपण कशी रोखू शकतो, याविषयी मार्गदर्शन करणारी भूमिका केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी मांडली आहे. दिल्लीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत के. विजय राघवन यांनी ही भूमिका मांडल्यामुळे केंद्र सरकार आणि देशभरातील राज्य सरकारांसाठी ही महत्त्वाची बाब ठरली आहे.
देशातील सर्व आरोग्य यंत्रणांसोबतच प्रशासकीय व्यवस्थापनाला देखील यावेळी के. राघवन यांनी सूचनावजा इशाराच दिला आहे. आपण जर कठोर पावले उचलली, तर तिसरी लाट कदाचित कुठेच येणार नाही. स्थानिक, राज्य तसेच जिल्हा पातळीवर आणि शहर पातळीवर आपण करोनाबाबतचे नियम किंवा मार्गदर्शक सूचना किती प्रभावीपणे अंमलात आणतो, यावर हे सर्वकाही अवलंबून असेल, असे ते म्हणाले. त्यामुळे करोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे सांगतानाच या नियमांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करणे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.