लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षकांचा दावा
फिर्यादीला महिनाभरात परत केली जातेय रक्कम
पुणे – लाचखोरीचा “ट्रॅप’ लावण्यासाठी देण्यात आलेली रक्कम परत मिळविण्यासाठी सरकार दरबारी वर्षानुवर्षे मारावे लागणारे हेलपाटे आणि त्यानंतर कामाला लागत असलेला विलंब यामुळे सर्वसामान्य नागरिक या विभागाच्या कार्यालयाकडे फिरकतही नव्हता. त्यामुळे लाचखोरांचे चांगलेच फावले होते, त्याची गंभीर दखल घेत हे पैसे अवघ्या एका महिन्यात देण्याची तजवीज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. त्याशिवाय त्यांची रखडलेली कामेही करुन देण्याची जबाबदारी या कार्यालयाने घेतली आहे. त्यामुळे लाचखोरांना आळा घालण्यास प्रशासनाला यश आले आहे.
गेल्या काही वर्षांत पुणे विभागात लाचखोरी वाढली आहे. मात्र, एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला अथवा कर्मचाऱ्याला लाच देण्यासाठी फिर्यादी व्यक्तीला ही रक्कम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आधी द्यावी लागत होती. सापळा यशस्वी झाल्यानंतर ही रक्कम परत मिळविण्यासाठी संबंधित फिर्यादीला या कार्यालयात वर्षानुवर्षे हेलपाटे मारावे लागत होते, स्वत: गुंतविलेली ही रक्कम परत मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने अशा प्रकारची तक्रार करण्यासाठी नागरिक टाळाटाळ करत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात आला असून सापळा यशस्वी झाल्यानंतर संबंधित फिर्यादीला अवघ्या महिनाभराच्या कालावधीत ही रक्कम परत करण्यात येत आहे.
त्यातूनच फिर्याद देण्याचा टक्काही वाढला आहे असा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केला. एखादा अधिकारी अथवा कर्मचाऱ्याच्या विरोधात तक्रार केल्यानंतर हे काम होण्यास त्यानंतरही विलंब होत होता. आपल्या सहकाऱ्याच्या विरोधात तक्रार केल्याचा राग मनात धरुन अनेक कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी हे काम करण्यास टाळाटाळ करत होते, ही बाब लक्षात घेऊन हे काम करुन घेण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी या फिर्यादीच्या सोबत संबंधित कार्यालयात जाऊन काम करुन देत आहेत, असा दावाही दिवाण यांनी केला.