मुंबई – राज्यातील प्रार्थना स्थळे पुन्हा खुली करण्यावरून भाजपने राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. राज्यात हॉटेल्स, बार सुरु करण्यास परवानगी मिळते मात्र प्रार्थना स्थळे खुली करण्यास परवानगी मिळत नाही असा मुद्दा मांडत भाजपने राज्यभर आंदोलन केलं. अशातच आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत सरकारच्या मंदिरे व जिम सुरु न करण्याच्या निर्णयामागचे कारण सांगितले आहे.
भातखळकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबाबतची भूमिका मांडली. भातखळकर यांनी ट्विटद्वारे, “मंदीरे सुरू केली नाही, जिम सुरू केल्या नाहीत…. कारण ही मागणी विरोधकांनी केली होती… लोकांना कारण दिले की कोरोना पसरेल, मग मेट्रो सुरू करण्यामागचा तर्क काय? तर्क विचारणे चूक, कारण हे सरकार तर्काने नाही तर अहंकाराने चालते…” असा आरोप लगावला आहे.
मंदिरे खुली करण्याबाबत राज्यपालांचेही पत्र
राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरं टाळेबंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं होत. यामध्ये राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक असतानाही मंदिरे बंद का? असा प्रश्न उपस्थित केला. सोबतच तुम्हाला याबाबत काही दैवी संकेत मिळतात का? अशी खोचक विचारणाही केली होती.
उत्तरादाखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात, मला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधणाऱ्यांचे हसत स्वागत माझ्या हिंदुत्वात बसत नाही असं म्हंटल.