मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता चांगलाच चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घटना घडल्यानंतर त्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. दरम्यान,या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“कानडी जनता जर आक्रमक भूमिका घेत असेल, तर महाराष्ट्रातील जनतेने आक्रमकता सोडलेली नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे. हा वाद लवकरात लवकर मिटला नाही, तर आम्हीदेखील शरद पवारांसह कर्नाटकात जाऊ असा इशाराही एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला आहे.
पुढे बोलताना खडसे,“शरद पवारांनी ४८ तासांच्या आत हा प्रश्न सोडवा, अन्यथा स्वत: कर्नाटकात जाणार असल्याचा अल्टिमेटम दिला आहे. आम्हीदेखील त्यांना सोबत देत कर्नाटकपर्यंत जाऊ,” असे म्हणाले.
तर “राज्य सरकारने बोटचेपीची भूमिका घेतली आहे. दोन्ही बाजूला भाजपाचं सरकार आहे. पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करुन हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. पण राज्य सरकार प्रामाणिकरणे, गांभीर्याने याकडे पाहत नसल्याचं दिसत आहे,” अशी टीकाही खडसेंनी केली आहे.