उपमुख्यमंत्री अजित पवार : पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासाला प्राधान्य देणार
पुणे – पुण्यातील मेट्रोसाठी भाजप सरकारने गेल्या वर्षी निधी दिला नाही. मात्र, निधी मिळाला नाही म्हणून मेट्रोचे काम थांबणार नाही. अर्थमंत्री या नात्याने पुण्याच्या विकासासाठी कार्यरत आहे त्या निधीतून मेट्रोलाही निधी द्यावा लागणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पुण्यातील रिंगरोडचा प्रकल्पाचे बजेट 14 हजार कोटींपर्यंत होते. मात्र, अधीच्या सरकारने वेळेत काम न केल्यामुळे आता 22 हजार कोटींपर्यंत बजेट गेल्याचे पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ,
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला लागणारी रक्कम गृहीत धरून बाकीच्या कामाला निधी देण्याबद्दलचे कामकाज सुरू केले आहे. मला ज्या कामाची आवड आहे ते पालकमंत्रिपद मला दिले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक कामे करायची आहेत. अर्थ विभागाची जबाबदारी असल्यामुळे संपूर्ण राज्याला त्यांच्या त्यांच्या कामासाठी उपलब्ध निधीतून पैसे देण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे. तसेच कामांचा पाठपुरावा वेळोवेळी केला जाईल. सारथी संस्थेबाबत त्यांना विचारले असता, सारथी संस्थेमुळे चांगलचं झाल्याची बाजू ऐकायला मिळते. तर दुसरीकडे त्यासंदर्भातील वेगळीच फाईल मंत्रालयात आली आहे. ती फाईल मी मागवून घेतली आहे.
सारथी संस्था जर मराठा समाजातील मुलांना किंवा ज्या घटकांसाठी सारथी अस्तित्वात आली आहे ते काम तिथे योग्य चालले असेल तर सरकार त्याच्या पाठीशी राहील; परंतु सारथीच्या नावाखाली कुणी काही वेगळे करत असेल आणि ते सिद्ध होत असेल तर तिथे बदल केला जाईल. त्यातील त्रुटी दूर केल्या जातील आणि सर्व विचार करूनच यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुणे व पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी आपण सदैव आग्रही असल्याचे पवार म्हणाले.
पुढच्यावेळी आणखीन लवकर येणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच अधिकाऱ्यांची बैठक बोलविल्यामुळे अधिकाऱ्यांची धांदल उडाली. त्याबाबत अगोदरच्या सरकारने एवढ्या लवकर बैठका घेतल्या नाही असे त्यांना विचारले असता, मागच्या सरकारने काय करावे तो त्यांचा अधिकार आहे. त्याची उणी-धुणी काढण्याचा अधिकार नाही. पवारसाहेब आणि आम्हाला लवकर उठून काम करण्याची सवय आहे. आता ती सवय आहे म्हटल्यावर मी काही करू शकत नाही. मी दररोज येणार नाही, आठवड्यातून एकदाच येणार आहे. त्यामुळे एकदा लवकर आले तर काय झाले. पुढच्यावेळी आणखीन लवकर येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.