पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अवघ्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात रिपाइंला एकही जागा सोडली नाही. त्यामुळे अगोदरच नाराज असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा हाच वाईट अनुभव विधानसभा निवडणुकीमध्ये देखील येताना दिसत असून,
महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत पक्षाला सहभागीही करून घेण्यात आले नाही त्यामुळे पुण्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महायुतीच्या प्रचारात सहभागी होणार नसल्याची घोषणा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पुण्यात केली.
रिपब्लिकन पक्षाने मुंबईतील चेंबूर धारावी, अहमदनगरमध्ये श्रीरामपूर, उत्तर नागपूर, यवतमाळमधील डमर खेड, नांदेड मधील देगल्लूर, पुण्यातील पिंपरी- चिंचवड, कॅन्टोमेंट मतदारसंघ आदी मतदारसंघांची मागणी केली आहे.
मात्र, प्रत्यक्षात महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर करण्यात येत असून, रिपाइंला विश्वासात घेण्यात आलेले नाही, तसेच पुण्यातून किमान एक जागा वडगावशेरी, कॅन्टोमेंट यापैकी एक सोडावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. जागा वाटपाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते ‘महायुतीच्या’ प्रचारात सहभागी होणार नसल्याचे या वेळी सांगण्यात आले.
शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, प्रदेश सदस्य अशोक कांबळे, ऍड. मंदारजो महेंद्र कांबळे, बसवराज गायकवाड, पुणे शहर सरचिटणीस शाम सदाफुले, युवक अध्यक्ष विरेन साठे, संदीप धांडोरे, अविनाश कदम, भारत भोसले, जितेश दामोदरे, रोहित कांबळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.