नवी दिल्ली – दिल्लीत येणे-जाणे हे सुरुच असते. त्यात नवीन असे काही नाही. महाराष्ट्रात अनेक प्रकल्प सुरु आहेत. त्यासाठी केंद्र सरकारचे मार्गदर्शन आणि सहाकार्य मिळत असते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत दाखल होताच दिली.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर होते. शिंदे यांनी दिल्लीत दाखल होताच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भेट घेतली. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्रिमंडळ विस्तारासाठी तुम्ही दिल्लीत दाखल झाला आहात का?, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, दिल्लीत माझे येणे-जाणे सुरुच असते. अनेक महत्त्वाचे प्रकल्प सध्या महाराष्ट्रात सुरु आहेत. त्यासाठी केंद्र सरकारचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत असते. त्यामुळेच दिल्लीत आलो आहे. कसं आहे समविचारी पक्ष एकत्र आले की विकास निश्चितच होत असतो.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या भेटीकरिता वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेली भेट ही सदिच्छा भेट होती. तर शरद पवार अध्यक्ष असलेल्या मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमासाठीचे आमंत्रण देण्यासाठी शरद पवार हे वर्षा बंगल्यावर आले होते, असे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.