दुबई – मुंबई इंडियन्सचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा आपल्या कीटबॅगमध्ये सर्वात जास्त बॅट बाळगतो, असे संघातील एका सदस्याने लाईव्ह चॅटमध्ये सांगितले होते. त्यावर रोहितने स्पष्टीकरण दिले आहे. माझी फलंदाजीची शैली अन्य फलंदाजांपेक्षा वेगळी आहे. मुळातच मी जास्त वजनी बॅट वापरतो, त्यामुळे आक्रमक फलंदाजी करत असताना माझ्या बॅट लवकर बाद होतात, त्यामुळेच कोणत्याही सामन्यात सहभागी होताना माझ्या कीटमध्ये जवळपास 9 बॅट असतात, असे स्पष्टीकरणही रोहितने दिले आहे.
कसोटी क्रिकेट खेळताना 2 किंवा 3 बॅट कीटमध्ये असल्या तरी चालते. एकदिवसीय व टी-20 सामने खेळताना मात्र बॅट लवकर बाद होतात. मोठे फटके मारण्यासाठी वजनी बॅट वापरत असल्याने त्याची झीजही लवकर होते. बॅटचा बुंधा खराब होतो, तसेच ब्लेडलाही तडे जातात. विशेषतः टी-20 सामने खेळताना जास्त बॅट वापरल्या जातात. अशा सामन्यांमध्ये सातत्याने इम्प्रोव्हायझेशन करून काही फटके खेळले जातात त्यामुळे बॅट लवकर खराब होतात. यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी अमिरातीत दाखल होताना माझ्या कीटमध्ये 9 बॅट बाळगल्या आहेत ते याच कारणाने, असा खुलासाही रोहितने केला आहे.
आयपीएलसह आंतरराष्ट्रीय टी-20 किंवा एकदिवसीय सामने खेळताना जर भारतातच सामने असतील तर कीटमध्ये इतक्या संख्येने बॅट बाळगण्याची गरज नसते. मात्र, परदेशात मालिका खेळताना जास्त बॅट असणे महत्त्वाचे असते. काहीवेळा भारतातही हा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून जास्त बॅट बाळगल्या तर अडचण येत नाही. अनेकदा बॅट लवकर खराब झाल्यावर मी कुरीयरनेही बॅट मागवल्या आहेत. मात्र, सध्या करोनाच्या धोक्यामुळे अनेक कुरीयर कंपन्या वेळेत बॅट पोहोचवतील का, असा प्रश्न असल्यानेच अमिरातीत येताना जास्त बॅट आणाव्या लागल्या, असेही रोहितने सांगितले.