मुंबई – मनसेच्यावतीने मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर दिसले. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भाजप मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले होते. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर भाष्य केलं आहे. दानवे यांनी यावेळी तीनही पक्षांच्या नेत्यावर टोलेबाजी केली.
अंबादास दानवे यांना मनसे,शिंदे आणि फडणवीस यांच्या नव्या राजकीय समीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले,उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेची भीती या सर्वांच्या मनात आहे. या दहशतीमुळे हे सर्व नेते एकत्र येत आहेत. ” एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना दानवे यांनी हे स्पष्टीकरण दिले.
त्यांना मोठं कस म्हणायचं
तीन मोठे नेते एकत्र येत आहेत यावर काय सांगाल असं दानवे यांना विचारले असता ‘या नेत्यांना मोठं कस म्हणायचं असा खोचक टोला दानवे यांनी लगावला. एकाने ४० आमदार घेऊन शिवसेना फोडत गद्दारी केली,एकाचा महाराष्ट्रात एकही आमदार नाही प्रत्येक आंदोलन अर्धवट सोडतात तसेच एकजण मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री झालेत मग यांना मोठं कस म्हणायचं असा टोला दानवे यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरे यांची भीती वाटत असल्यामुळेच हे सर्वजण एकत्र येत असल्याचे अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितले.