आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्शवभूमीवर आज काँग्रेसतर्फे आपला जाहीरनामा सादर करण्यात आला आहे. काँग्रेसने आपला जाहीरनामा सादर केल्यानंतर लगेचच भाजप नेत्यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया नोंदविण्यास सुरुवात केली आहे. अरुण जेटली, योगी आदित्यनाथ, अमित शहा यांसारख्या भाजपच्या बड्या नेत्यांनी काँग्रेसचा हा निवडणूक जाहीरनामा देशाचे तुकडे करणारा असल्याचं म्हंटलं आहे.
दरम्यान, काँग्रेसने जाहीर केलेल्या या जाहीरनाम्याबाबत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष तथा जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी समाधान व्यक्त केले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना ओमर अब्दुल्ला काँग्रेसला उशिरा का होईना जाग आली अशी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “मी जेव्हा जम्मू काश्मीरचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी मी काँग्रेसकडे AFSPA (सैन्य दलांना विशेष अधिकार देणारा कायदा) हटवण्याचा मुद्दा जाहीरनाम्यात असावा असा आग्रह धरला होता मात्र काँग्रेसमधील काही नेत्यांनी कटकारस्थान करून असे होऊ दिले न्हवते त्यावेळी माझ्या मागणीला केवळ पी चिदंबरम साहेबांनी पाठिंबा दिला होता. मात्र आता काँग्रेसने या मुद्द्याचा आपल्या जाहीरनाम्यात समावेश केला असल्याने मी समाधानी आहे.”