नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे संत माणूस होते. परंतु ते देखील पाकिस्तान बरोब युद्ध करणार होते असा गौप्यस्फोट ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी केलाय. “मुंबईवरील २६/११ सारखा दहशतवादी हल्ला भारतात पुन्हा झाला असता तर पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग पाकिस्तानसोबत युद्ध करणार होते,” असा दावा कॅमरून यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे.
कॅमरून यांनी युरोपियन युनियनमधून (ब्रेक्झिट) बाहेर पडण्याच्या मुद्यावरून राजीनामा दिला होता. कॅमरून यांनी नुकतचे ‘फॉर द रेकॉर्ड’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी भारताविषयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्याविषयी काही आठवणी सांगितल्या आहेत. कॅमरून हे ब्रिटनचे पंतप्रधान असताना त्यांनी दोनवेळा भारत दौरा केला होता.
मनमोहन सिंग यांच्या बद्दल ते म्हणाले आहेत की “पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. ते संत माणूस आहेत, पण भारतासमोर धोका निर्माण झाल्यानंतर ते कणखर व्हायचे. मुंबईत २६/११ चा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मी भारताच्या दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग मला म्हणाले, “भारतात २६/११ सारखा हल्ला पुन्हा झाला तर भारत पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई करेल.”