मुंबई – संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपच्या वाढत्या वर्चस्वाला ब्रेक लावत तृणमूल काँग्रेस पक्षाने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात आघाडी घेतली. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. ममता बॅनर्जी यांच्या यशाचे सर्वच स्थरातून अभिनंदन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील ममता बॅनर्जी यांच्या विजयावर खास प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं की, “समोर कितीही बलाढ्य शक्ती असली, तरी त्यांच्याशी लोकांच्या साथीने त्याच आक्रमकपणे लढा दिल्यास त्यांनाही पराभूत करता येतं, याचं उदाहरण देशातील सर्वच पक्षांसाठी ममता बॅनर्जी दीदींनी दाखवून दिलं. या विराट विजयाबद्दल पश्चिम बंगालच्या जनतेचं आणि ममता दिदींचं मनःपूर्वक अभिनंदन !”.
यापूर्वीच पश्चिम बंगालमधील विजयाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ममता यांचं अभिनंदन केलं आहे. सध्या तृणमूल काँग्रेस 212 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप अवघ्या 78 जागांवर आघाडीवर आहे.