बॅंकाकडून सुरक्षेबाबत दुर्लक्ष : दोन हजार एटीएमची रोज तपासणी पोलिसांना शक्य नाही
बैठकीत सज्जड इशारा : शहरात एटीएमबाबत 13 गुन्हे दाखल
पिंपरी – रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या नियमांनुसार बॅंकांनी एटीएमबाबत सुरक्षा उपाययोजना करावी. जर एटीएमच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास बॅंकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिला आहे.
पोलीस आयुक्तालयात सोमवारी (दि. 16) दुपारी शहरातील बॅंकांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीकरिता 50 हून अधिक बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पोलीस आयुक्त संदीप बिष्णाई यांनी स्वतः बॅंकांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आयुक्त म्हणाले, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत दोन हजार एटीएम सेंटर आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये एटीएमबाबतचे तब्बल 13 गुन्हे दाखल झाले आहेत. रविवारी पहाटे चाकण जवळील म्हाळुंगे येथील एटीएम मशीनच चोरट्यांनी उखडून नेली. ही मशीन अवघ्या दोन स्क्रूवर उभी केली होती. अशाच प्रकारे इतर ठिकाणीही एटीएमच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात आहे.
आयुक्त म्हणाले, अनेक ठिकाणी एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसतात. काही ठिकाणी ते बंद अवस्थेत आहेत. काही एटीएम निर्जन ठिकाणी आहेत. अशा ठिकाणी बाहेर पुरेशी लाईटची व्यवस्था व चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. यामुळे एखादी चोरीसारखी घटना घडल्यास आरोपींची तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन याची माहिती मिळू शकेल. एटीएम सेंटरची मधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी. एखादा गैरप्रकार आढळल्यास मोठ्या आवाजातील सायरन वाजवावा. एटीएम शक्यतो बॅंकेच्या शाखेजवळ असावा. त्याठिकाणी सुरक्षा रक्षकही नियुक्त करावा. शहरातील दोन हजार एटीएमची दररोज तपासणी करणे, पोलिसांना शक्य नाही. एटीएमच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करणे स्थानिक अधिकाऱ्यांच्या हातात नसते. मात्र वरिष्ठ पातळीवर याबाबत कळविण्यास सांगितले आहे.
एटीएमच्या गुन्ह्यातील तपास करण्यासाठी 12 जणांचा समावेश असलेली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या एसआयटीकडे इतर कोणाताही तपास दिला जाणार नाही. एटीएमच्या चोऱ्या करणाऱ्या आंतर राज्यातील चार टोळ्यांकडे आपण लक्ष केंद्रीत केले आहे. यापैकी एक टोळी महाराष्ट्रातील आहे. एसआयटीकडून होणाऱ्या तपासाची माहिती दररोज आपण स्वतः घेणार आहोत. महिनाभरात आपण आरोपींना अटक करू. तसेच एटीएम चोरी करणाऱ्या टोळीला आळेफाटा येथे पकडले आहे. या टोळीला चिखली येथील गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात आले आहे.