नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील तणावावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीन आणि पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे कडक इशारा दिला आहे. दुसऱ्यांच्या इच्छेने नव्हे तर जेथे धोका दिसेल तेथे युद्ध करू, असे अजित डोवाल यांनी म्हंटले आहे.
विजयादशमीनिमित्त उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील परमार्थ निकेतनमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अजित डोवाल म्हणाले कि, भारताचा इतिहास प्रत्येकालाच माहिती आहे. आम्ही कधीच कोणत्या देशावर हल्ला केला नाही. परंतु, जेथून आम्हाला धोका वाटेल, तेथे आम्ही हल्ला करणारच हे निश्चित आहे.
आपल्याला जेथे वाटते, तेथे आम्ही लढावे हे आवश्यक नाही. जेथून आम्हाला धोका दिसेल, तेथे आम्ही लढू. आम्ही युद्ध तर करणार, आमच्या भूभागावरही आणि बाहेरील भूभागावरही. मात्र, ते आम्ही आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर परमार्थासाठी करू, असेही अजित डोवाल यांनी म्हंटले आहे.
भारत आपली समृद्ध संस्कृती आणि सभ्यतेमुळेच कुठलाही धर्म अथवा भाषेच्या मर्यादेत बांधला गेला नाही. एवढेच नाही, तर याच भूमीवरून वसुधैव कुटुंबकम आणि प्रत्येक माणसात ईश्वराचा अंश आहे, या तत्वज्ञानाचा प्रचार झाला. एक देश म्हणून भारताला मजबूत ओळख देण्यात आणि संस्कारक्षम बनविण्यात येथील संत मंडळींचे मोठे योगदान आहे. येथील संतांनी राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मोठे योगदान दिले आहे, असेही अजित डोवाल यांनी सांगितले.