मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. सुशांत मृत्यू प्रकरण, कंगना प्रकरण व मदन शर्मा मारहाण प्रकरणानंतर विरोधकांनी राज्य सरकारला कात्रीत पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करत विरोधकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
अशातच आज अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी मोदी सरकारकडे केली आहे.
याबाबत बोलताना राणा यांनी, “कोरोनाची स्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी,” अशी मागणी केली आहे.
राणा यांचा कंगनाला सल्ला
शिवसेना व कंगना यांच्या दरम्यान रंगलेल्या वादानंतर कंगनाने अनेक टोकाची विधाने केली होती. दरम्यान, कंगनाबाबत बोलताना राणा यांनी, “तिने फक्त आपल्याबद्दल बोलावं, इतरांबद्दल नाही. बॉलिवूडने तिला सर्व काही दिलं असून त्यावर आरोप करु नयेत” तिला असा सल्ला दिला.