नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा दैदीप्यमान सोहळा नुकताच पार पडला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह मोजकेच निमंत्रित उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर योगी आदित्यनाथ यांनी अन्य मुद्द्यांवरही मोकळेपणाने चर्चा केली. यावेळी मशिदीच्या कार्यक्रमासाठी जाणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मला कोणी बोलावणारही नाही आणि मी जाणारही नाही. जर मी त्या ठिकाणी गेलो तर अनेकांच्या दुकानांना टाळे लागेल,असे उत्तर त्यांनी या प्रश्नाला दिले. एका हिंदी वृत्तवाहिनीशी त्यांनी विशेष संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सर्वधर्मियांना निमंत्रण देण्यात आले होते आणि ते कार्यक्रमातही सहभागी झाले, यासंदर्भातही त्यांना सवाल करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी आपण मशिदीच्या कार्यक्रमासाठी जाणार नसल्याचे म्हटले. माझे जे काही काम आहे ते मी करणार. बाकी मला त्या ठिकाणी ना बोलावण्यात येईल ना मी जाणार. जर मी त्या ठिकाणी गेलो तर अनेकांच्या दुकानांना टाळी लागतील, असेही ते म्हणाले.
राम मंदिराच्या भूमिपूजन हा माझ्यासाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि भावनिक क्षण होता. मझ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी जबाबदारी दिली आहे ती पूर्ण करणे हे माझे कर्तव्य समजतो. माझ्या गुरू परंपरेने हा संकल्प अनेक दशकांपूर्वी पाहिलेला. तो आता साकार झाला आहे. मंचावर असलेले लोकं राम जन्मभूमीसोबत आत्मियतेनं जोडले गेलेले आहेत. हा आमच्यासाठी नक्कीच उत्साहाचा दिवस होता, असेही योगी आदित्यनाथ बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या राम सर्वांचेच आहेत या वक्तव्यावरही भाष्य केले. प्रभू श्रीराम हे सर्वांचेच आहेत ही गोष्ट आम्ही पहिल्यापासूनच म्हणत आहोत. ही सदबुद्धी यापूर्वीच यायला हवी होती. ते कोणाचे पूर्वज होते ज्यांना रामलल्लाचं मंदिर नको होते, असेही योगी यावेळी म्हणाले.