मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर काल आला. प्रतोत भरत गोगावले यांनी निवड चुकीची असल्याचे न्यायालयाने सांगितले तसेच राज्यपालांच्या कामावर देखील न्यायालयाने ताशेरे ओढले. अशात आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध गोष्टींबाबत भाष्य केले. यावेळी बोलताना ठाकरेंनी आपण राजीनामा का दिला याबाबत देखील सांगितले.
काल सत्तासंघर्षांचा निकाल लागला तेव्हा न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत भाष्य केले. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्हाला घड्याळाचे काटे मागे नेता आले असते असा सूतोवाच यावेळी न्ययालयाकडून करण्यात आला. ठाकरेंचा राजीनामा हा या प्रकरणामध्ये कळीचा मुद्दा ठरला. यावरून आता त्यावेळी राजीनामा नेमका का दिला याबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिल आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले,”महाराष्ट्राची बदनामी थांबली पाहिजे.. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांना मुख्यमंत्री करता आलं असत हे न्ययालयाचे निरीक्षण म्हणजेच हे सरकार बेकायदेशीर आहे. मी माझ्या निर्णयवरती आजही समाधानी आहे. मी नैतिकतेला स्मरून राजीनामा दिला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ठाकरे पुढे म्हणाले,”ज्या लोकांना माझ्या वडिलांपासून अगदी मी सुद्धा माझ्या पक्षप्रमुख काळामध्ये सर्वकाही भरभरून दिल आपलं मानलं विश्वास दिला. त्या विश्वास घातक्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवावा हे मला चालल नसत आणि अशा विश्वास घातक्यांचं सर्टिफिकेट घेऊन मला मुख्यमंत्री राहण्यामध्ये रस नव्हता म्हणूनच मी राजीनामा दिला”
काल कोर्टाने नोंदवली महत्वाची निरीक्षणे
भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर
राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती..
ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने सरकार परत आणलं असत
१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे..
सुनील प्रभू योग्य प्रतोद कोर्टाचा निर्णय
खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा