सातारा -राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार जर मला ओळखत नाहीत, तर मी सुद्धा शरद पवार कोण? त्यांना ओळखत नाही. ज्या पक्षाला राष्ट्रीय दर्जाच नाही, अशा नेत्यांच्या वक्तव्यांना किती गांभिर्याने घ्यायचे, असे जोरदार प्रत्युत्तर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी आज बुधवारी सातारा येथे दिले.
सातारा दौऱ्यामध्ये कोण अजय मिश्रा? मी त्यांना ओळखत नाही असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्या वक्तव्याचा मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत चांगला समाचार घेतला.
मोदी ऍट नाईन उपक्रमांतर्गत श्री. मिश्रा यांनी येथील हॉटेल प्रिती एक्झिक्युटिव्हमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मिश्रा यांनी उत्तरे दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा पराभव केला जाऊ शकतो हे कर्नाटक निकालाने दाखवून दिले आहे.
त्यामुळे भाजप केवळ राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका चव्हाण यांनी साताऱ्यात केली तसेच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीसुद्धा युनोमध्ये भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप केला होता या प्रश्नाच्या संदर्भाने मिश्रा म्हणाले, “राहुल गांधी यांना हा देश म्हणजे स्वतःची जहागिरी वाटते. सत्ता असल्यामुळे त्यांची मक्तेदारी होती. मात्र आता सत्ता नसल्यामुळे विरोधकांची पंचायत झाली आहे. त्यांची वक्तव्ये नैराश्यामधून होत आहेत. भाजपने गेल्या नऊ वर्षांमध्ये महागाईचा दर हा गेल्या वीस वर्षाच्या तुलनेने 4.8 इतका कमी ठेवण्यात यश मिळवले आहे. म्हणजे देशाचा विकास होत आहे,’ हा त्याचा अर्थ असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात मिश्रा म्हणाले, “या विषयावर बोलणे म्हणजे न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यासारखे आहे. यामुळे न्यायालयाचा निकाल प्रभावित होऊ शकतो. जी काही प्रक्रिया आहे, ती न्यायालयाच्या माध्यमातूनच निकाली काढली गेली पाहिजे. त्यामुळे या विषयावर मी जास्त बोलू शकत नाही,’ असे सांगून महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा विषय त्यांनी टाळला. कोल्हापूर येथील दंगली संदर्भात बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे यांच्या युतीचे सरकार आहे. ते सक्षमपणे निर्णय घेऊ शकतात. यासंदर्भात ते सर्व घटनांचा आढावा घेऊन दोषींना निश्चितच शासन करतील, असा विश्वास व्यक्त करुन ओरिसा रेल्वे
दुर्घटनेच्या संदर्भातही त्यांनी संवेदनशीलता प्रकट केली.
महाराष्ट्रामध्ये भाजपची बांधणी मजबुतीने सुरू असून येथील 48 लोकसभेच्या जागा निवडून आणण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप हा आकडा गाठल्याशिवाय राहणार नसल्याचेही त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला अजय मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची यादीच वाचून दाखवली.
माझ्या मतदारसंघात निवडणूक लढवा
शरद पवार यांच्या वक्तव्याच्या संदर्भाने विचारलेल्या प्रश्नावर मिश्रा म्हणाले, “प्रत्येक नेते आपापल्या पद्धतीने नेहमीच बोलत असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पक्ष महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांची वक्तव्ये किती गांभिर्याने घ्यायची हा सुद्धा प्रश्न आहे. शरद पवार यांनी माझ्या मतदारसंघात येऊन तेथून निवडणूक लढवून दाखवावी,’ असे आव्हानही मिश्रा यांनी दिले.
======================