मुंबई – गेल्या अडिच दशकात एचडीएफसी बॅंकेला खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक म्हणून विकसित करणारे एचडीएफसी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पुरे निवृत्त झाले.
आयसीआयसीआय बॅंक या स्पर्धक बॅंकेसह अनेक बॅंकांनी आदित्य पुरी यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे म्हटले आहे. आयसीआयसीआय बॅंकेने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, भारतीय बॅंकिंग व्यवस्थेत गेल्या पंचवीस वर्षात आमूलाग्र बदल झाले आहेत. त्यामध्ये पुरी यांचा सिंहाचा वाटा आहे.
भारतात गेल्या पंचवीस वर्षात बऱ्याच खासगी बॅंका उदयास आल्या आहेत मात्र. त्यांच्यावर काही प्रमाणात अयोग्य व्यवहाराचे आरोप झाले आहेत. मात्र एचडीएफसी बॅंकेवर कधीही कसल्याही प्रकारचा आरोप झाला नाही. मात्र बॅंकेने आगेकूच केली.
1990मध्ये पुरी एका आंतरराष्ट्रीय बॅंकेचे प्रमुख होते. एचडीएफसीचे प्रमुख दीपक पारेख यांनी त्यांना भारतातील बॅंकिंग वातावरण बदलत असल्यामुळे नवी बॅंक उभी करण्यासाठी निमंत्रित केले. सुरुवातीला पुरी यांनी मुंबईतील एका कापड गिरणीच्या जागेत उंदरांच्या सहवासात काम सुरू केले. नंतर या बॅंकेने कधी कागे वळून पाहीले नाही.
सुरुवातीला फक्त कंपन्यांना कर्ज देण्याचे काम केले जात होते. मात्र भारतातील रिटेल बाजारपेठ मोठी असल्याचे पाहून एचडीएफसी बॅंकेने संपुर्ण भारतात आपल्या कार्याचा विस्तार केला. सुयोग्य बॅंकिंगच्या नियमाचे कधीही तडजोड न करता बॅंक विस्तारत गेली आणि आता खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक झाली आहे. असे म्हटले जाते की, पुरी घड्याळ वापरत नाहीत. मोबाईल फोनही बाळगत नाहीत. आता पुरी यांची जागा त्यांनीच निवड केलेले शशीधर जगदीश घेणार आहेत.
स्वच्छ बॅंकिंगचे रहस्य
बड्या बॅंकर्सबरोबर मोठे उद्योजक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मैत्री करण्याचा प्रयत्न करीत असतात. विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यामुळे बऱ्याच बॅंका अडचणीत आल्या आहेत. मात्र एचडीएफसी बॅंक वादग्रस्त झाली नाही.
याबाबत बोलताना आदित्य पुरी यांनी स्वच्छ बॅंकींगचे रहस्य सांगितले. ते म्हणाले की, खराब व्यवहार असणाऱ्या चांगल्या मित्रांना माझ्याकडून कॉफीशिवाय काहीही मिळत नाही. त्यामुळे अयोग्य व्यवहारासाठी एचडीएफसी बॅंकेकडे कर्ज मागण्यास कोणीही फिरकत नाही.