मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय नाट्याच्या शेवट झाल्यानंतर गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाले. शिवसेनेच्या राजकीय कारकीर्दचा आणि जडणघडणीत साक्षीदार असलेल्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, या शपथविधीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यपालांनुसार, शपथविधी सोहळ्यात प्रोटोकाॅलनुसार व्यवस्था करण्यात आली नव्हती. शपथविधी सोहळ्याची व्यवस्था प्रशासनाला करु दिली नाही. त्यामुळे मंचावर अनेक त्रुटी पाहायला मिळाल्या. तसेच शपथ घेताना आमदारांनी सुरुवातीला आपल्या नेत्यांची नावे घेतली, यावरही भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. भविष्यात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात असे प्रकार घडू नयेत. अशा कृत्यांमुळे सोहळ्याची प्रतिष्ठा खालावते, असे त्यांनी म्हंटले आहे. याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आक्षेप नोंदवला असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंसह शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील व छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच काँग्रेसने नेते आमदार बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.