सोरतापवाडी – जिल्ह्यातील विविध परिसरात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजूरांसाठी उरुळी कांचन रेल्वे स्टेशवरून आतापर्यंत नऊ विशेष श्रमिक रेल्वे धावल्या आहेत. उत्तर प्रदेश व बिहार येथील नागरिक व कामगारांसाठी मंगळवारी (दि. 26) दोन विशेष श्रमिक रेल्वेचे नियोजन करण्यात आले होते. पहिली रेल्वे उरुळी कांचन ते सिवान (बिहार) 979 परप्रांतीय प्रवाशांसह दुपारी 1 वाजता तर दुसरी रेल्वे दुपारी 4 वाजता प्रयागराज (उत्तर प्रदेश) साठी 1400 परप्रांतीय प्रवासी घेऊन रवाना झाली.
उत्तर प्रदेश व बिहारला जाणारे नागरिक मंगळवारी उरुळी कांचन येथील विद्यालयाच्या मैदानात जमा झाले. त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. रेल्वे सॅनिटायझर करण्यात आली होती. तेथून त्यांना दोन वेळेचे जेवण, लहान मुलांना बिस्किटे व पाणी देऊन गाडी बसविण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने आणि हवेली तालुका महसूल प्रशासन, रेल्वे प्रशासन, व ग्रामपंचायत उरुळी कांचन यांच्या वतीने हे नियोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी पुणे शहरातील संतोष देशमुख, शिरुरच्या तहसीलदार लैला शेख, मंडलाधिकारी दिपक चव्हाण, उपसरपंच जितेंद्र बडेकर उपस्थित होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली सई भोरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर व सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गुरुवारी (दि. 7) पुणे जिल्ह्यातून पहिली विशेष श्रमिक रेल्वे मध्यप्रदेशला उरुळी कांचन रेल्वे स्टेशनवरूनच सोडण्यात आली होती.